रविवार, २० डिसेंबर, २००९

चारी मुंडया चितपट

चारी मुंडया चितपट
कोल्हापुरच्या एस.टी. स्टँड वर उतरलो तेंव्हा सकाळचे दहा वाजले होते. प्रवासाने सगळं अंग कस आंबून गेलं होत. देवीच्या दर्शनाला जायच तर ते सर्वसामान्य भक्ता प्रमाणे एस.टी. च्या लाल डब्यातूनच जायचे हा हट्ट. या हट्टा पायी स्वारगेट वरून ड्रायव्हरला गाडी घेऊन परत पाठविला. आता त्याचा पश्चाताप होत होता. एस.टी.स्टँड च्या बाहेर रस्त्यावर येऊन चोहिकडे नजर फिरवली. जवळपास एकही रिक्शा दिसली नाही. हातात ताज्या हिरव्यागार भाजीची पिशवी घेऊन जाणार्‍या एका ईसमास हटकले ..

" ओ ~~ भाऊ ! ईथं रिक्शा स्टँड कुठं आहे ? "

त्या ईसमानं तोंड फिरऊन माझ्या कडे पाहिलं . नजरेला नजर भिडली आणि मी प्रचंड वेगाने भूत काळात ढकलला गेलो. त्या ईसमाची अवस्थाही मझ्या सारखीच झाल्याचे त्याच्या चेहेर्‍या वरचे भाव सांगत होते. मझे मन reverse gear मधे प्रचंड वेगाने धावत होते. जेमतेम अर्ध्या मिनिटात पुर्‍या चाळीस वर्षांचा प्रवास करून ते शेवटी एका बिंदूवर स्थिरावले. त्याला मी ओळखत होतो. खात्री करून घेण्या साठी मी प्रस्तावना केली ....

"तुम्ही बापुराव बनसोडे कां ? "

समोरचा चेहरा उमलला अन आम्हा दोघा भोवती चार तपां पुर्वीचा सुगंध दरवळला. त्या दरवळीचा आस्वाद घेण्या पूर्वीच त्याचे शब्द कानावर धडकले ...

"कोन ! नान्या तू व्हय ? किती दिसानी भेटतुयास मर्दा ? "

कानाची छिद्र बोटांनी बंद करून स्वतःच उच्चारलेला दीर्घ ॐ कार ऐकल्या सारखे वाटले. त्या शब्दांनी माझे हल्ली "हळवे" झालेले कान तॄप्त झाले.

बाप्या माझा शाळेतला जोडीदार. धावत्या युगात आम्ही एकमेकांना पूर्णपणे विसऊन गेली होतो. आज चाळीस वर्षा नंतर अशी अचानक भेट व्हावी ही नियतीची किमया म्हणावी लगेल. त्याच कारण असं कि, नव्या बंगल्यावर राहायला जाऊन मला पुरी दहा वर्षे झाली. मात्र शेजारच्या बंगल्यात रहाणार्‍या माणसांना मी आज तागायत ओळखत नाही. अशा युगात, चाळीस वर्षा पूर्वीचा सहकारी भेटावा अन आम्ही दोघांनी एक-मेकांना ओळखावे ही नियतीची किमया नाहीतर दुसर काय ?. एके काळी आम्ही दोघांनी एक-मेकांचे "प्रतिस्पर्धी" म्हणून शाळा गाजवली होती. अभ्यास, परीक्षा, स्पर्धा, गँदरिंग, मैदान ईतकेच नव्हे तर हाणामारी सुध्दा !. प्रत्येक क्षेत्रात हा बाप्या माझा प्रतिस्पर्धी म्हणून लढत होता, पडत होता, पुन्हा उठून माझ्या समोर उभा ठाकत होता, पण कधीच जिंकत नव्हता. स्वतः हरल्याचं दुखः सुध्दा हा मझ्या बरोबरच "सेलिब्रेट " करीत होता. हाँटेलात वडा-पाव खाऊन ! . बाप्या हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व. प्रवाहाच्या दिशेन वहात जाणं त्याला कधीच मान्य नव्हतं. विरुध्द दिशेने पोहून, नाका-तोंडात पाणी जाईपर्यंत गटांगळ्या खाल्याच दुखः त्याला कधी झालच नाही.

S.S.C.ला बाप्याचा "निकाल" लागल्याच मला मित्रांकडून समजलं. नंतर तो कुठ गायब झाला हे कुणालाच समजलं नाही. मी काँलेज मधे रमलो.हळुहळू मझ्यातील बाप्या धूसर झाला. पदवी नंतर नोकरी निमित्ताने मी गांव सोडल. काही वर्षात पुण्याला स्थाईक झालो. तो पर्यंत माझ्यातील "धूसर" बाप्या पूर्ण नष्ट झाला होता. चाळीस वर्षात या जगात आणी विषेशतः माझ्यात बरीच उलथा-पालथ झाली होती. माझ्यातील "मी" पूर्ण पणे बदलला होता. त्यातील बहुतांशी बदल हे, परिस्थिती नुसार हेतुपुरस्सर घडविले गेले होते. भरगच्च "अर्थ-प्राप्ती" साठी "अर्थ-हीन" आयुष्य मी केंव्हा स्विकारलं हे मला कधी समजलच नाही. बदललं नव्हतं ते माझ शरीर आणि मनातील एक छोटासा कोपरा !
असा कोपरा कि ज्याला जपण्या साठी मी जिवापाड तगमगलो होतो !
आईच्या शुध्द, सुसंक्रुत संस्कारांचा कोपरा !
सामाजिक क्रांतीच्या प्रदुषणा पासून सुरक्षित ठेवलेला तो कोपरा !
चाळीस वर्षात हळू-हळू, हपत्या-हपत्याने "कोमात" गेलेला तो कोपरा !
स्थितप्रज्ञ ! स्तब्ध ! असा तो कोपरा !

बाप्याच्या आठवणी त्याच कोमातल्या कोपर्‍या दडलेल्या असाव्यात. कारण आज बाप्याला समोर पाहून त्या कोपर्‍यात क्षीण हालचाल जाणवली.
कोमातून बाहेर पडण्याची निष्फळ हालचाल !
बाप्याने मला आवेगानं मिठी मारली. त्या कोमच्या कोपर्‍यात हवी-हवीशी वेदना जाणवली.

"नान्या ! आदि घरी चल. हितं जवळच र्‍हातुया ! "

बाप्याच्या शब्दांनी मी भानावर आलो. पाय आपोआप बाप्याच्या पाठोपाठ चालू लागले. एसटी स्टँड पासून पांच मिनिटांच्या अंतरावर, अनेक प्रकारच्या झाडांनी वेढलेल्या एका जुनाट कौलारू घरा समोर बाप्या थांबला.
"आलं बग आपल घर ! "
बाप्या आमच घर म्हणाला नव्हता. आपल घर म्हणाला होता. घरा भोवतीचा सर्व परिसर पाँश बिल्डींगनी व्यापला होता. मधेच ही बाप्याची भली मोठी जागा आणि त्यावर उभं असलेल जुनाट कौलारू घर लोकांची नजर खेचून घेत होतं. घराच्या अवती-भवती सर्व प्रकारच्या झडा-झुडपांनी खच्चून भरलेल जंगल. तारेच्या कुंपणातून आत आलेवर हिलस्टेशन ला आल्या सारखं वाटलं. आजच्या या कोल्हापूर शहरात बाप्याच घर म्हणजे एक पुरातन वास्तु वाटत होतं. बाप्याच्या वया पेक्षा घराचेच वय जास्ती वाटत होतं. अंगणात शेणाने सारवलेल तुळशी वृंदावन, त्यातील ताजे-तवाने तुळशीचे रोप, सांजवातीने काजळी धरलेली दिवळी, वृंदावना भोवती सडा, त्यावर काढलेली पांढरी शुभ्र रांगोळी, त्यावर वाहिलेलं हळदी-कुंकू. या सर्व प्रथमदर्शनी गोष्टी त्या घरात वावरणार्‍या गृहल्क्षमी बद्दल बरच काही सांगून गेल्या. मी एकटक कितीतरी वेळ पाहात उभा होतो.

त्या कोमातील कोपर्‍या पुन्हा क्षीण हालचाल !
कोमातून बाहेर पडण्याची निष्फळ धडपड !

बाप्याच्या आवाजाने मी भानावर आलो. सारवलेल्या पडवीत बाप्या शेजारे टेकलो. भाजीची पिशवी पडवीतल्या खांबाला टेकवीत बाप्याने आवाज दिला ..

"ए~~ हिरा ! भाईर ये ! बग तरी कोन आलयां !"

दाराच्या चौकटीत काचेच्या बांगडया किणकिणल्या. नऊवार साडी अन लाल भडक कुंकवाचा भरगच्च टिळा ल्यालेली एक पंचविशिची मुलगी माजघराचा उंबरठा ओलांडून पडवीत आली. समोर अनोळखी व्यक्तीला पाहून झटकन एक पाऊल मागं घेऊन डोक्या वरचा पदर सावरला. चेहर्‍यावर निरागस हास्य अन कुतुहूल. बाप्याने ओळख करून दिली.

"ही माझी सून ! हिरा ! आन बरकां हिरा, हा माझा लंगोटी यार, नान्या ! यकाच साळंमंदी शिकलो बग आमी दोगबि !"

हिरानं चट्कन पुढे येउन वाकून नमस्कार केला. मला एवढ्या respect ची सवय नव्हती. किंबहुना या प्रकारच्या सवई त्या कोमातील कोपर्‍यात झोपल्या होत्या. मी पुरता भांबाऊन गेलो. मोठया प्रयत्नांनी आशिर्वादाचे शब्द आठऊन मी तोंड उघडलं ....

"अखंड सौभाग्यवती भवं !"

बाप्या मात्र अखंड पणे बोलत होता ....

"नान्या ! ही सातार्‍याची बरकां ! पोरानं माझ्या पसंतीला मान दिला. म्हनून ही या घरात आली बग!. ग्रँज्युएट झालिया ! मंजी माझ्या परीस लय हुषार काय ? हा~हा~हा~~! आता समद घर हिच सांभाळती ! मला पन, माझ्या पोराला पन आन घराला पन ! "

सुनेच कौतुक बाप्याच्या चेहेर्‍यावर ओसंडून वाहात होतं. सासर्‍याने स्वतःच्या बालमित्रा समोर, अगदी मोजक्या शब्दात केललं भलमोठ कौतुक ऐकून हिरा सुखावली होती. मनापासून आनंद झाल्यावर चेहर्‍यावर उमलणार स्मितहास्य घेऊन ती माजघरात गेली. परत आली ती स्वच्छ चकचकीत पितळी मध्ये गुळाचा खडा अन भुईमुगाच्या शेंगा घेऊनच. काळ्या मातीत कडक उन्हात वाळविलेल्या भुईमुगाच्या शेंगा. सोबत स्वच्छ पितळेच्या तांब्यातील थंडगार पाणी. अनोळखी वाटसरूला पाणी देण्याची ही खूप जुनी परंपरा ईथं अजून जिवंत होती. मोठया आदबीन पितळी अन तांब्या माझ्या समोर ठेउन हिरा आंत गेली. तसा मी अवेळी काही खात नाही. परंतू कित्येक वर्षापासून दुरावलेला गावरान मेवा पाहून मला मोह आवरला नाही. आत्ता पर्यंत मी खाण्याच्या विविध ठिकाणांचे अन विविध प्रकारचे मेनू चाखले होते. रस्त्या वरील हातगाडीवाल्या पासून ते पंचतारांकित हाँटेल पर्यंत आणी अडीच बाय चार चे फोल्डींग डायनिंग टेबल बाळगणार्‍या मध्यम वर्गीय कुटुंबा पासून ते हजार चौरस फुटांचा स्वतंत्र "डायनिंग हाँल " बाळगणार्‍या उच्चभ्रू फँमिली पर्यंत. परंतू हिराने पितळी मधे सर्व्ह केलेला मेनू अन त्या मागच्या भावना मला कुठं गवसल्या नव्हत्या अन गवसणारही नव्हत्या.

त्या कोमातील कोपर्‍या पुन्हा क्षीण हालचाल !
कोमातून बाहेर पडण्याची निष्फळ धडपड !

बाप्या स्वच्छ अन साध्या शब्दात स्वतःचा मागील चाळीस वर्षातील प्रवास सांगत होता. मी गुळ शेंगाचा आस्वाद घेत त्याचा प्रत्येक शब्द हृदयात साठवीत होतो. S.S.C. ला नापास झालेवर बाप्या काही दिवस शेतात राबला. एक दिवस शेतात किर्डू चावल्याचं निमित्त होऊन त्याचे वडील दगावले. या अकस्मीत घटनेचा धसका घेऊन त्याच्या आईने अंथरूण धरले. एक वर्षाच्या अंतराने तिनेही प्राण सोडले. बाप्या पूर्ण पोरका झाला. गावकीत चांगला जम बसविलेल्या बाप्याच्या so called पुढारी चुलत्याने या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. पुढारीगिरीचा प्रयोग स्वतःच्याच पुतण्यावर करून, तलाठयाच्या मदतीने, वडलार्जित ज़मीन स्वतःच्या नावावर चढऊन घेतली. अगोदरच पोरक्या झालेल्या बाप्याला अनाथ करून टाकले. वैतागून बाप्याने गांव सोडलं. कोल्हापुरच्या एस टी ला पाय दिला. दूरच्या नात्यातील चुलत-मावस मामाच्या ओळखीन एका गँरेज मधे "पडेल ते काम " या प्रोफाईल वर रुजू झाला. चार सहा महिने मामाच्या घराच्या गँलरीत पडून राहिला. झोपायला अन "गिळायला". हो. बाप्या साठी मामी "जेवायला" ऐवजी "गिळायला" हाच शब्द वापरीत होती. हळू हळू आतल्या खोलीतील मामीची धुसफुस जाणीव पुर्वक गँलरीत ऐकू एऊ लागली. मामीचे जिव्हारी रुतणारे विषारी शब्द आळवीत बाप्या रात्र जागवीत होता अन दुसर्‍या दिवशी उशीरा कामाला जाऊन मालकाच्या शिव्या खात होता.

अशाच एका तिरसटलेल्या सकाळी बाप्या उठला अन आठ दिवसांची रजा टाकून परत गावी गेला. वडिलांच्या वाटयाला आलेल आठ खणं वडिलोपार्जित घर आणि आईच्या नावावर होतं म्हणून चुलत्याच्या दाढेतून बचावलेल कष्टार्जित चार बिघा माळरान फुकून टकलं. मिळाले तेव्हडे पैसे घेऊन गावाला कायमचा रामराम ठोकला. पुन्हा कोल्हापुरात दाखल झाला. शेटजीच्या ओळखीन गावठाणा बाहेर माळावर दहा गुंठे जागा घेऊन लगेच पाया खांदायला सुरवात केली. स्वतःच घर बांधायची झिंग बाप्याच्या डोक्यात शिरली होती. गँरेज मधली पोरं त्याला साथ देत होती. गँरेज मधलं काम सांभाळून घराला मूर्त स्वरूप येत होतं. बघता बघता मातीच्या भींती उभ्या रहिल्या. चौकटीचा नारळ फुटला. भंगाराच्या दुकानातून स्वस्तात आणलेल्या चार खिडक्या बसऊन झाल्या. एक दिवस सुट्टीच्या दिवशी गँरेज मधली झाडून सगळी पोरं साईट वर हजर झाली. कौलं टाकली, दरवाजा बसवला. जमीन चोपली. भिंतींना पावडर फासली. परिसर साफसुप केला.....

झालं घर तयार !
स्वतःचं घर ! "कुनाच्या बां चं भ्या " नसलेल घर!

त्या रात्री बाप्यानं गँरेज मधल्या पोरांना हाँटेलात ईर्जिक घातली. मामा-मामीच्या घरातल्या धुमशीनं पेट घेण्या पूर्वी बाप्यानं गँलरीतील वळकटी उचलून प्रस्थान ठेवलं. मामा-मामीच घर सोडण्यापूर्वी त्या दोघांच्या पायाला हात लावायला विसरला नाही. दगडापेक्षा वीट बरी अन सख्या चुलत्या पेक्षा दूरची मामी बरी. बाप्या तिथून एकटाच निघाला ते थेट स्वतःच्या घरात दाखल झाला. तेहि ऐन आमावस्येच्या मुहुर्तावर. कुलूप उघडून आंत गेला. आई-बापाचा फोटो दर्शनी भिंतीवर लावला अन ढसाढसा रडला. एकटा. एकाकी. डोक्यातील झिंग उतरेपर्यंत रड-रड रडून शेवटी कसा-बसा शांत झाला.

आवसेच्या मुहुर्तावर विना सवाष्णीचा गृहप्रवेश अनुभवलेली हीच ती वास्तू ! .
अनेक बर्‍या-वाईट प्रसंगांनी mature झालेली ! संपन्न झालेली वास्तू ! .
कष्टाच्या घामाने भिजून चिंब झालेली वास्तू ! .
आई-वडिलांच्या आशिर्वादाने समृध्द झालेली वास्तू ! .
बाप्याच्या अपार प्रेमाने न्हालेली वास्तू ! .
सहकार्‍यांच्या निरपेक्ष, निष्कपट सहकार्याने उभी केलेली वास्तू ! .
एक जिवंत वास्तू ! .

बाप्याच्या शब्दांचा झरा माझ्या कानांत खळखळत होता. हिराने फेसाळलेल्या गरम-गरम चहाचे पेले आमच्या समोर केंव्हा आणून ठेवले ते समजलेच नाही. त्या साठी बाप्याला " दोन कप चहा टांक ! " अशी आँर्डर द्यायची गरज पडली नव्हती. तशी ही गोष्ट किरकोळ. पण या वास्तूत सुसंस्क्रूत रिती-भाती रुजल्याची जाणीव करून देण्यास पुरेसी. चहा करीत असताना, पडवीत चाललेल्या आमच्या संभाषणावर हिराचे पुर्ण लक्ष होत हे तिच्या बदललेल्या चेहर्‍यावर उमटल होतं. घरंदाज सासुरवाशीण, आपल तोंड न उघडता, श्रवण शक्तीच्या जोरावर माणसाची अचुक पारख करू शकते हे खरं. हिराच्या तोंडून अजून एकही शब्द बाहेर पडला नव्हता. तरी सुध्दा तिचे निष्पाप डोळे माझ्याशी खूप काही बोलून गेले. डोळ्यांची भाषा जाणण्याची माझी शक्ती त्या कोमाच्या कोपर्‍यात जागॄत झाली होती. पुढच्याच क्षणी हिराने मौन सोडले.

"मामंजी ! आता जिउनच जायच बगा ! मी सयपाकाला लागलिया !"

हिराच्या शब्दात आदब होता, अधिकार होता, प्रेमळ आज्ञा होती आणि सर्वात सुखद धक्का म्हणजे तिने मला "जेवणार का ? " अस विचारलं नव्हत. सरळ स्वतःचा निर्णय जाहीर करून ती स्वयपाक घरात अंतर्धान पावली होती. हिराचा प्रत्येक शब्द त्या कोमाच्या कोपर्‍यात जाऊन धडकला होता.

त्या कोमातील कोपर्‍या पुन्हा क्षीण हालचाल !
कोमातून बाहेर पडण्याची निष्फळ धडपड !

मी चुळ-बुळ करीत काही बोलण्यासाठी तोंड उघडणार तोच बाप्याने मला हाताच्या ईशार्‍याने गप्प केले.

"कायपन उपेग व्हनार नाय बोलून ! ती यकदा जिउन जा म्हनली कि गुमान जिउनच जायच बग ! तिच्या म्होरं आजुन माजं काय चालत नाय तर तू कुटला कोन ? हा~ हा~ "

खरं होत बाप्याचं. मी कुठला कोण, पण त्याच्या सुनेन, केवळ तासाभराच्या परिचयात मला मामंजी बनवलं होतं. किती सुखद वाटला तो शब्द ! कुठली कुणाची अनोळखी पोर. क्षणात स्वतःची मुलगी वाटायला लागली. मला उद्देशून "मामंजी" हा आदरयुक्त भावनेनी उच्चारलेला शब्द मी प्रथमच ऐकला होता. माझ्या कानांना सवय होती ती, पिझा-बर्गर च्या राशीतील, डँड-पाँप सारख्या उथळ शब्दांची. अर्थात शब्दातील फरकाने नातं बदलत असं नाही. मात्र त्या शब्दाची खोली किती आहे, त्याचा उगम जिभेवर झाला कि र्‍हुदयात हे समजत. या दोन्हीतील फरक जाणून घ्यायचा असेल तर त्याला "माझा जन्म" घ्यावा लागेल. "मामंजी आता जिउनच जायचं " या हिराच्या चार शब्दांचा उगम तिच्या र्‍हुदयात होता. म्हणुनच ते शब्द माझ्या मनात घुसून सरळ त्या कोमातील कोपर्‍यावर जाउन धडकले.

मी विचार करायला लागलो. आपल्या कडे आलेल्या व्यक्तीला आपण "जेऊन जा " असं म्हणालो तर ती व्यक्ती लगेच जेवायला बसते कां? मग हे दोन शब्द उच्चारायला आपल्याला असा कितिसां खर्च येतो ? क्षणभराची जिभेची अन ओठाची हालचाल व तोंडातून बाहेर टाकलेली थोडी अशुध्द हवा. बस्स. एवढ्च .दोन्ही फुकटच्या गोष्टी. आणि हे दोन शब्द उच्चारायला वेळ खर्च होणार तो जेमतेम पाव सेकंद! पण हे दोन शब्द समोरच्या माणसावर किती खोलवर परिणाम करतात! त्या माणसाच्या मनातील तुमची प्रतिमा किती उंचावते ! मग कां बरं हल्ली असे शब्द दुर्मीळ व्हावेत ? मी स्वतःला सुशिक्षीत, बुध्दीमान समजतो. मग हिराला जे क्षणात जमलं ते मला आज पर्यंत कां नाही उमगलं ?

बाप्यानं मला पुन्हा भानावर आणलं. हिरा स्वयपाकात गुंतल्याच आतून येणार्‍या भांड्यांच्या आवाजावरून जाणवत होत. बाप्या स्वतःचा प्रवास पुढे सांगत होता.......

अवसेला गृहप्रवेश केलेली वास्तू त्याला धार्जिन झाली होती. शुभशकुनी ठरली होती. गँरेज मधले चार कामगार बाप्याच्या घरात राहायला आले होते. घरभाडयाचं थोडफार उत्पन्न येऊ लागल. गँरेज मधे मनापासून राबणार्‍या बाप्याचा प्रामाणिक पणा शेटजी न बरोबर हेरला. हळू हळू बाप्याचा पगार अन त्याच बरोबर जबाबदार्‍याही वाढविल्या गेल्या. नाहीतरी शेटजी ला बरेच दिवसा पासून गँरेज साठी एका विश्वासू माणसाची तलाश होती. शेवटी एक दिवस गँरेज ची संपूर्ण जबाबदारी बाप्यावर सोपऊन, शेटजीनं महिन्यातून एकदा फक्त नोटा मोजण्याच काम स्वतः कडे ठेवलं. परिसरातील लोक आता त्या गँरेज ला "बापुरावचं गँरेज" म्हणून ओळखू लागले. बाप्याची आर्थिक घडी मजबूत झली. हातात पैसा खेळू लागला. बँक बँलन्स ने फुगवटा धरला. घराचे नुतनिकरण झाले. भोवतालच्या, पोटच्या पोरा प्रमाने वाढविलेल्या, हिरव्या गार झाडांची ऊंची वाढली. त्यांनी घरावर मायेची सावली धरली. शेटजीच्या मध्यस्तीने बाप्याचे दोनाचे चार हात झाले. लग्नाच्या मांडवात शेटजीनं बाप्याच्या हातावर आहेराचं पाकीट ठेऊन त्याच्याशी पहिल्यांदाच हस्तांदोलन केलं. बाप्या नमस्कार करण्या साठी वाकणार तोच शेटजीने त्याला मधेच थांबऊन प्रेमाने मिठी मारली. बाप्याला आजचं हे शेटजीचं वागण जरा वेगळच वाटलं. रात्री गँरेज मधल्या सगळ्या पोरांनी मोठया हौसेन वरात काढली. गुपचुप एक-एक चपटी पोटात रिचऊन सर्वजण वरातीत देधमाल नाचले.

दुसर्‍या दिवशी बाप्याने शेटजी न दिलेलं आहेराच पाकीट उघडलं. पाकिटातून नोटा ऐवजी स्टँपपेपर निघालेला पाहून बाप्या चक्राउन गेला. मजकुरावरून नजर टाकली अन बाप्याचे डोळे भरून आले. काल मांडवात शेटजी न केलेल हस्तांदोलन अन मारलेल्या प्रेमळ मिठीचं रहस्य उलगडलं होतं. काल पासून बाप्या गँरेजचा आठ आणे मालक झाला होता. शेटजीन केलेला हा आहेर म्हणजे बाप्याच्या प्रामाणिक पणाची पावती होती. बाप्याची बायको लक्ष्मीच्या पावलाने आली होती. बाप्याने लगेच तिचं सासरच नाव "लक्ष्मी" ठेऊन टाकलं. लक्ष्मी ने घराचा ताबा घेतला. तिचा हात घरभर फिरला अन बघता बघता ही वास्तू उमलली, दरवळली, मोहरली. गृहलक्ष्मी शिवाय घराला शोभा येत नाही हेच खरं. लक्ष्मीसारखी जोडीदारीण मिळाली म्हणून बाप्याने कधीनव्हेते महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन पहिल्यांदाच डोकं टेकलं. जोडीनं आईची खणा-नारळानं ओटी भरली. लक्ष्मीवहिनीने बाप्याला नस्तिकाचा आस्तिक बनवला. धर्मानं स्री पेक्षा पुरुषाला अधिकारांच ढळतं माप दिलं खरं , पण धर्म टिकऊन ठेवण्यात मोलाचा वाटा स्रियांचाच आहे. कुलधर्म-कुलाचाराच्या बहुतांश जबाबदार्‍या स्रीच सांभाळत असते.
बाप्याला नास्तिकाचा आस्तिक बनविणारी लक्ष्मीवहिनी नक्कीच तेजस्वी गृहिणी असावी .....

हो. असावी. भूतकाळ ! कारण बाप्याची जिवलगी, त्याला अर्ध्या वाटेवर सोडून भरल्या कपाळानं निघून गेली. जाण्या पूर्वी वंशाचा वारस बाप्याच्या पदरात टाकून गेली. कौतुकानं लक्ष्मीने मुलाच नाव "प्रसाद" ठेवलं होतं. महालक्ष्मीचा प्रसाद. नवसाचा प्रसाद बारा वर्षाचा असताना लक्ष्मी अचानक किरकोळ आजाराचं निमित्त होऊन देवाघरी गेली. लक्ष्मी तशी निरक्षरच. लिहिता-वाचता येण्यापुरती "चार बुकं" शिकलेली. पण तिच स्वप्न मात्र प्रसादला ईंजिनिअर करण्याच होतं. ते स्वप्न तिच्या मागे बाप्याने पूर्ण केले. आता प्रसाद एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर नोकरी करीत होता. नोकरीत उत्तमरित्या स्थिर-स्थावर झाल्यावर प्रसादने, वडिलांनी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात डोळे झाकून माळ घातली. "माझं सुख हेच माझ्या वडिलांच एकमेव ध्येय आहे" याची जाणीव प्रसादला होती. त्यांनी पसंत केलेली मुलगीच मला अन मझ्या कुटुंबाला सुखी करू शकते हे प्रसादला पक्क ठाऊक होतं. आणी ते खरं ही ठरलं. हिरा घरात आली अन पुन्हा घर हसायला लागलं. प्रसाद-हिरा नं बर्‍याच वेळा बाप्याला गँरेज दुसर्‍याला चालवायला देऊन आराम करण्याचा आग्रह केला. पण बाप्याचा कायम एकच ठेका...

" आरं पोरानु, नुस्ता घरात बसून काय करू ? खायला कार अन धरणीला भार ! हातपाय हालत्यात तोवर हालवायचं ! मग हायेच की घरात बसनं ".

बाप्याचा नातू आता बालवाडीत जातो. घरात नातू आल्यावर एक दिवस बाप्याने हिरा व प्रसादला समोर बसऊन, गंभीरपणाचा आव आणीत स्वतःची V.R.S. जाहीर केली. बाप्याने घेतलेला VRS चा निर्णय अन त्याचा दिलेला खुलासा ऐकून हिरा-प्रसादला हसू अनावर झालं. पण ते त्यांनी गालातच दाबलं. बाप्याच VRS जाहीर करण्या मागच गुपीत दोघांना चांगलच ठाउक होतं आणी अपेक्षित सुध्दा होतं. नातू झाल्या पासून बाप्या सर्व जग विसरला होता. गँरेज मधे मन लागत नव्हतं. त्याला पुन्हा बालपण आलं होतं. नातवा भोवती पिंगा घालण्यात सर्व वेळ घालवीत होता. VRS शिवाय पर्याय नव्हता. नातवाला अंगा खांद्यावर खेळवीत, सुनेचा भरला सुखी संसार डोळ्यात साठवीत, उर्वरीत आयुष्य आनंदात घालवायच हे बाप्याचं एकमेव ध्येय उरल होतं. त्याचा आपला सधा सोपा सरळ हिशेब ......

" काय करायचय आता पैका कमउन ? पोरगा पोटा पुरत कमावतुया ! नातू अंगा खांद्यावर खेळतुया ! हीच माझी माप कमाई !"

ठराविक मर्यादे पलिकडील अर्थ संचय म्हणजे "जालीम वीष " हे बाप्याने योग्य वेळी ओळखले होते.

माजघराच्या चौकटेतून बाहेर डोकावीत हिराने आवाज दिला...

"आगुदर चार घास खाऊन घ्या अन मग बसा निवांत बोलत ! मी ताट करतिया !"

अंगणातील शिळे शेजारी पाण्याने भरलेलं घंगाळ आणी तपेली तयार होती. सासूबाईंच्या रुकवतातील भांडी हिराने जपली होती. मी हातपाय धुतले. रुमाल काढण्या साठी हात खिशाकडे जाणार तोच हिराचा हात पुढे आला. तिच्या हातात स्वच्छ धुतलेला पांढरा शुभ्र पंचा होता. स्वतःला नेमकं काय हवं हेच मुळी विसरलेल्या आजच्या पिढीत, दुसर्‍याला काय हवं आणि ते केंव्हा हवं याची निश्चित जाण या वास्तूत होती. पंचाला हात पुसत मी बाप्या पाठोपाठ माजघरात दाखल झालो. भिंती लगद घोंगडीची घडी टाकून तयार होती. त्यावर आम्ही दोघं टेकताच हिराची लगबग सुरु झाली. तांब्या भांड मांडल गेलं. दोन वटकावनं ठेवली गेली. पितळेच्या थाळीत काळ्या घेवडयाच्या डाळीची आमटी (कोरड्यास ) आणि शाळूची पांढरी फेक गरम गरम भाकरी. साधाच पण तोंडाला पाणी सुटेल असा बेत. विकतच्या Branded लोणची-चटण्याची सजावट नाही, महागडया dish मधून कल्पकतेने मांडलेले (अर्थात कामवाल्या मावशिंनी) green salad आणी fruits नाहीत, fridge मधे साठविलेल्या sweet dish चा फार्स नाही, calaries आणी fats चा हिशेब नाही कि काटेचमचे अन सुर्‍या नाहीत. समोर होती फक्त आमटी-भाकरी अन बाप्याने बुक्की मारून फोडलेल्या कांद्याचा, माझ्या वाटयाचा अर्धा भाग. तो ही फोलपटा सकट !( salad म्हणा हव तर). तरी सुध्दा मला ते "पूर्णब्रम्ह" वाटलं. हिरा सारख्या सात्विक गृहिणीने, निरपेक्ष वृत्तीने रांधून आपुलकीने वाढलेलं पूर्णब्रम्ह. पहिल्याच घासाला माझ्या तोंडून प्रतिक्रीया उमटली...

"व्वा ! मस्त ! बाप्या, खरंच सुगरण आहे तुझी सून ! "

माझ्या कौतुकास्पद शब्दांनी सुखावलेली हिरा बोलती झाली...

" घाय गडबडीत सादा-सुदाचं सयपाक केलाया मामंजी ! पोर समजून गोड मानून घ्या !"

हिरा चौकटी जवळ बसून आमच्या "उदर भरण " सोहळ्यावर बारीक नजर ठेउन होती. ताटातील भाकरीचा शेवटचा घास तोंडात घाले पर्यंत पुन्हा गरम भाकरी ताटात पडत होती.तिच्या हालचालीत विलक्षण चपळाई होती. आणि खाणार्‍याला पोटभर खाउ घालण्याची ईच्छाशक्ती. नको-नको म्हणून हाताचे तळवे ताटावर पसरून धरायला मुळी ती वेळच देत नव्हती.

माझ्या मनांत एक प्रश्न येऊन गेला. "सुगरण" कुणाला म्हणायचं ?. net वरून गोळा केलेल्या receipe च्या भांडवलावर रुचकर dishes बनऊन, डायनिंग टेबलावर बुफे मांडणार्‍या home minister ला, कि रुचकर पदार्था बरोबर प्रेम, आपुलकी रांधून अथितीला आग्रह पूर्वक पोटभर जेवायला भाग पाडून त्याची शाबासकी मिळवणार्‍या अन्नपूर्णेला ? .अवघड आहे!
हिराने आचरलेल्या service system ची मला सवय नव्हती. rather सवय मोडावी लागली होती. गेली कित्येक वर्षे मी कामवाल्या मावशींनी dine table वर मांडलेल बुफे गिळत होतो. (हो! गिळतच होतो. लोक त्यालाच "जेवत होतो " समजतात.) त्या मुळे माझा आहार किती अन मी खातोय किती याचा आज मेळ बसत नव्हता. सोबत बाप्याच्या मनसोक्त गप्पा पण चालू होत्या. खूप दिवसांनी योग्य श्रोता मिळाल्याने त्याला कंठ फुटला होता. ईतका वेळ माझ्या व्यवहारी मनांत घोळणारे पण हेतुपुरस्सर दाबून ठेवलेले विचार शेवटी ओठावर आलेच...

" बाप्या ! तुझी ही जागा अगदी मोक्यावर आहे. आजुबाजूला development पण चांगली झाली आहे. अशा prime location ला दहा गुंठ्याचा plot म्हणजे आजच्या market rate ला साठ-सत्तर पेटी सहज मिळतील नाही ? "

बाप्या हसून मान डोलवीत म्हणाला...

"खरं हाय तुझं ! लय बिल्डर लोक गळ घालून र्‍हायल्यात ! बक्कळ पैका दिउन्शान आनि वरती र्‍हायला मोट्टा फ्ल्याट पर देतो म्हनत्यात. पर ही दोनी पोरं माज काय बी ऐकाया तयार न्हायती बग ! मी म्हंतु काय हार्कत हाय बिल्डराला ध्यायला ? आं ? हातात जास्तीचा पैका आला तर पोरीला चार डाग करता यतील. मोटा झाल्यावर नातवाला धाडू परदेसात ईंग्रजीत शिकाया . मोट्टा मानुस करू त्याला ! खर का खोटं ? तुच सांग आता ह्यास्नी ! "

हिराने मधेच हस्तक्षेप करून बाप्याच बोलण तोडीत तावातावाने पण ठामपणे स्वतःची अन आपल्या नवर्‍याची बाजू मांडली ..
..
"आता तुमीच ईचार करा मामंजी ! आमास्नी हे घर म्हंजी देवाच्या देवळा सारकं ! वडिलार्जित आशिर्वादाचा हात ! सासुबाईंची सावली हाये आमच्या डोक्यावर ! बिल्डर ते मोडून-तोडून पाक सपाट करून टाकील ! आमी कसं बगावं त्ये उघडया डोळ्यानी ? परत आस घर हुब र्‍हाईल का सांगा बरं ? पैका काय, आज हाय तर उध्या नाय ! काय गिळायचाय त्येला का डोंबलावर घिउन जायचाय ? आन तुमास्नी पुन्यांदा सांगुन ठिवते ! पोराला नाय पाटिवनार मी पर्देसात शिकाया ! लय लळा हाय त्याला आज्याचा ! आन अंगावर डाग लिउन कुटं मिरवायला जायचया मला ?हा माज्या गळ्यात यवडा मोटा डाग हायेकी ! ह्यची सर यनार हायका दुसर्‍या कोन्च्या डागाला ? "

गळ्यातील काळ्या पोतीत ओवलेल डोरलं दाखवीत हिरा तावातावाने बोलली. मला न्यायाधीश बनऊन हिराने दोन पिढ्यातील गोड तंटा निवाडया साठी माझ्या समोर सादर केला. न्यायदाना बरोबरंच दोन्ही पक्षकारांच्या वकिलकीची जबाबदारी पण माझ्यावरच सोपविली होती. हिरा एक पदवीधर मुलगी असून सुध्दा काळ्या मातीतील खास गावरान बोली बोलत होती. कारण प्रसादशी लग्न करून ती फक्त सासरी नांदायला आली नव्हती तर सासरच्या संस्कृतीत पूर्ण विरघळली होती. मोजक्या साध्या सुध्या शब्दात तिने आपली बाजू ठाम पणे मांडून आम्हा दोघांना निरुत्तर केलं होतं. सासर्‍याने बांधलेल अन सासूने फुलवलेलं हे घर तिच्या साठी फक्त निवार्‍याच स्थान नव्हत तर एक पवित्र मंदिर होतं. भविष्यात वडिलधारे प्रत्यक्ष घरात नसले तरी, या घराच्या रुपाने वडिलधार्‍यांची छाया आपल्यावर अखंड राहील म्हणून तिला हे घर हव होतं. property म्हणून नव्हे ! प्रशस्त flat आणि लाल नोटांची थप्पी हे builder च prapojal तिला या घरा पुढे कवडीमोल वाटत होतं. नकळत पणे हिराने मला अत्यंत महत्वाची दोन "सत्य" सांगीतली होती. ...

एक - पैसा आज असेल तर उद्या नसेल. तो चंचल आहे. त्याच्या अस्तितवाने माणसाची लायकी बदलत नाही. नोटांच्या ढिगार्‍या खाली त्याची खरी लायकी झाकली जाते अन अचानक आलेल्या वावटळीने नोटा उडून जाउन लायकी उघडी पडते.

दोन - पैसा गिळता येत नाही किंवा डोंबलावर सुध्दा घेउन जाता येत नाही. गिळाव लागतं ते अन्न ! आणि अन्न फक्त गिळून भागत नाही तर ते पचायला सुध्दा हवं. असमाधानी माणसाला कोणतच अन्न पचत नाही. मग गिळलेल्या अन्नच बनत ते फक्त वीष ! .

हिराच्या "पैका काय, आज हाय तर उध्या नाय ! काय गिळायचाय त्येला " या शब्दांनी माझ्या डोक्यात थैमान घातल होतं. आज जास्तीत जास्त पैसा कमावण्या साठी प्रत्येक मनुष्य धावतो आहे, धडपडतो आहे तरी सुध्दा त्याची पैशाची भूक भागत नाही. गरज आहे ती एकदा तरी अंतर्मुख होउन स्वतःलाच प्रश्न विचारण्याची. आपल पैसा कमवण्याचं basic objective काय आहे ? ते साध्य होतय का ? आणि ते साध्य झालेवर तरी आपण थांबतो कां ? सुखी होतो कां ? पैसा कमावण्याचं आपल्याला व्यसन तर लाललं नाही नां ?

हिरा माझ्याकडे पाहात होती. माझा न्याय निवाडा ऐकायला उत्सुक होती. मी बोलायला तोंड उघडल पण शब्दच फुटेना, गळा दाटून आला होता. त्या कोमातील कोपर्‍यात कळ आली होती. कसा बसा धीर एकवटून मी तोंड उघडले..

" बाप्या ! हिरा च म्हणन खरच बरोबर आहे. तिच्या लाडक्या घरकुलाला property चा हीन दर्जा देऊन मी त्याच मूल्यांकन पैशात करायला नको होतं. फार मोठी चूक झाली माझी. मला माफ कर. अमूल्य अशा अस्स्ल "हिर्‍या"च जतन करण्या साठी आई अंबाबाईनं निर्मान केलेल कोंदण आहे हे घर ! लाखो builder ओवाळून टाकावेत अस आहे हे तुझ्या लाडक्या सुनेच घरकुल ! ते विक्रीचा जिन्नस होण कदापी शक्य नाही !"

मझ्या या जडावलेल्या शब्दांनी वातावरण गंभीर झाल होत. हिराने मान बाजूला वळउन पदराला गुपचुप डोळे टिपले. तणाव कमी करण्या साठी मी विषय बदलला ......

" बाप्या, खरच तुझी सून सुगरण आहे. खूप दिवसांनी पोट फुटे पर्यंत जेवलो आज. आता तू पुण्याला ये एकदा पोरांना घेउन. "

बाप्याने मान डोलविली. आम्ही घोंगडी वरून उठलो. पडवीच्या कोपर्‍यात उभे राहून हा्त धुतले. तो पर्यंत हिराने पडवीत सुतडा अंथरून त्यावर पितळेचा पानाचा डबा ठेवला होता.
त्या कोमाच्या कोपर्‍यात धडपड वाढायला लागली होती. त्यातून असह्य कळ येण्या पूर्वी मला या वास्तू मधून बाहेर पडण आवश्य्क होतं. तो कोमातील कोपरा जागृत झाला तर माझा मुखवटा गळून पडणार होता. अन अस व्हायला खूप उशीर झाला होता. बाप्या सोबत सुपरी बरोबर चार गोष्टी चघळीत मी निघण्याच्या विषयाला हात घातला ...

" बाप्या, निघतो मी आता. बराच वेळ झाला. महालक्षीच दर्शन घेउन रात्री पर्य़ंत पुण्याला पोहोचायला हवं."

हिरान माझ बोलण मधेच तोड्लं...

" मामंजी ! र्‍हावाकी आता चार दिस ! पैल्यांदाच आलायसा आप्ल्या घरी ! निदान ह्यास्नी भेटून तरी जावा ! तुमचा नातू पन ईल साळतनं आत्ता !"

त्या कोमाच्या कोपर्‍यात हिरान पुन्हा आघात केला होता. त्यातून असह्य कळ निर्माण झाली होती. मी गुदमरून गेलो होतो. ईथून चटकन बाहेर पडण्याच नक्की करून मी उभा रहिलो..

"पोरी ! नको आग्रह करू ! मला आता निघायलाच हवं. घरी सर्वजण वाट पाहात असतील. आता तुम्हीच या सगळे पुण्याला. "

मी चक्क खोटं बोललो होतो. पुण्यात माझी कुणीही वाट पाहाणार नव्हतं. चप्पल घालण्या साठी मी पुढे झाल्याचे पाहून आता मी थांबणार नाही याची हिराला खात्री पटली. चटकन पुढे होउन तिने मला आदबीन नमस्कार केला. मी तृप्त मनाने आशिर्वाद दिला ...

"अखंड सौभाग्यवती भव ! विजयी भव ! सदा सुखी भव ! "

झपझप पावले टाकीत मी कुंपणा बाहेर पडलो. मागे वळून पाहाण्याचे धाडस झाले नाही. डोळ्यात दाबून ठेवलेले अश्रू कुठल्याही क्षणी दगा देणार होते. बाप्या-हिराच्या स्वभावातील पारदर्शकता माझ्यात नव्हती. मी नकळत पणे खोटेपणाचा बुरखा पांघरला होता. त्यांना पुण्याला येण्याच आमंत्रण दिल होत परंतु जाणीव पूर्वक घराचा पत्ता दिला नव्हता. कारण बाप्यान माझ्या घरी यायला मला नको होतं. सत्याला सामोर जायच धाडस माझ्यात नव्हत. सौभाग्य, सुख आणि विजय या तिन्ही गोष्टी हिराला भरभरून मिळाल्या होत्या. मग मी तिला असा आशिर्वाद देऊन काय साधलं होतं? rather हिराला असा आशिर्वाद देण्यास मी लायक होतो कां ? मुळातच स्वतः कडे नाही ते दुसर्‍याला देता येतं कां ?

समोर आलेल्या रिक्षाला हात करून मी सरळ S T Stand गाठले अन पुण्याच्या गाडीत बसलो. पुण्याहून महालक्षीच्या दर्शना साठी आलो अन रस्त्यातच गृहलक्षमीचे दर्शन घेऊन परत निघलो. पुण्याहून निघताना महालक्षीच दर्शन हे objective होतं. प्रत्यक्षात ते बाप्याच्या वास्तू मधून बाहेर पडण्या साठीच कारण ठरलं.

गाडीने कोल्हापुरची वेस ओलांडली होती. मी एकटक खिडकी बाहेर पाहात होतो. अंधार दाटू लागला होता. अजून पांच तासाचा प्रवास. म्हणजे मी रात्री दहा वाजता पुण्याला पोहोचणार होतो. त्या नंतरच्या सर्व activity या machanical स्वरुपाच्या होणार होत्या. pree-deviced plan प्रमाणे मी उतरण्याच्या पूर्वी पांच मिनिटे अगोदर driver ला SMS करणार होतो. ST Stand च्या gate वर driver सिगरेट फुकीत उभा राहाणार होता. यंत्र मानवा प्रमाणे मी ST तून उतरून driver ने आणलेल्या गाडीत बसणार होतो. अर्धी सिगरेट फेकीत driver गाडी start करणार होता. लवकरच त्याची duty संपणार म्हणून मनातले मनात आनंदणार होता. बंगल्याच्या गेट समोर गाडीचा horn वाजलेवर watch man नेहमी सारखा मरगळलेला सँल्यूट ठोकणार होता. gate समोर येण्या पुर्वीच horn देण्याच driver च prime objective हे watch man ला जागं करण, आणि secondary objective हे गेट ऊघडण आहे हे मला पुन्हा एकदा जाणवणार होतं. गाडी आत आलेवर गेट lock करताना watch man सुखावणार होता. कारण आता तो निर्धास्त पणे झोपू शकणार होता.माझ्या वाटयाच्या latch key ने मी दरवाजा उघडणार होतो. driver माझी bag माझ्या bedroom मधे फेकून पसार होणार होता. बंगल्यातील ईतर बंद bedroom पैकी एकही दरवाजा उघडणार नव्हता. पार्किंग मधील मोलकरणीच्या खोलीचा अर्धवट ऊघडा असलेला दरवाजा सुध्दा पूर्ण बंद होणार होता. कारण मला गिळण्या साठी अन्न गरम करून देण्याच टाळायच होत. या बंद दरवाजा मागे किती व्यक्ती हजर आहेत आणि किती व्यक्ती late night party साठी बाहेर आहेत याचा अंदाज फक्त पार्किंग मधील गाडयांच्या संखे वरूनच येणार होता. मी कपडे बदलणार होतो. fresh व्हायच टाळून सरळ डायनिंग टेबलावर जाणार होतो. कामवालीन शिजऊन ठेवलेल थंडगार अन्न गिळण्याची formality उरकणार होतो.तसाच झोपलो तरी त्याचा कुणाला काही फरक पडणार नव्हता. किंबहुना ते कुणाला जाणवणार देखील नव्हतं. family room मधील internal mail box मधे माझ्या साठी माझ्याच बायको-मुलांनी अन सुनांनी ठेवलेले massage वाचणार होतो. त्या नुसार उगवणार्‍या दिवसाच वेळापत्रक ठरविणार होतो. bed room चा दरवाजा बंद करून अजून एक नवीन दिवस उजाडण्याची वाट पाहाणार होतो.

" तो कोमातील कोपरा पुन्हा पूर्ण कोमात जाणार होता !"
" तिथं कसलीही हालचाल जाणवणार नव्हती ! "

ST Driver ने लावलेल्या जबरदस्त ब्रेक नी मी पुढच्या बाकावर आदळून भानावर आलो. पाठोपाठ driver ने मधेच तडमडलेल्या सायकल वाल्याला उद्देशून हासडलेली शिवी पण कानावर आली. गाडीन कराड सोड्लं होतं. लाल डब्याचा प्रवास मला झेपला नव्हता. शरिराचा सांधा-न-सांधा खिळ-खिळा झाला होता. कार नं फिरण्याच व्यसन महागात पडलं होत कि सर्वसामान्य भक्ता प्रमाणे एस.टी. च्या लाल डब्यातूनच प्रवास करायचा हट्ट महागात पडला होता हे माहीत नाही.

बाकाला पाठ टेकीत मी सर्व विचार झटकून टाकीत डोळे मिटले. बाप्या डोळ्या समोरून हटत नव्हता......
प्रवाहाच्या उलट दिशेनं पोहणार्‍या बाप्याला त्याच objective गवसलं होतं.....
तो आज एका अमूल्य "हिर्‍या" चा पालक होता................
माझ्या समोर कायम हार पत्करणार्‍या बाप्यानं आज मला हरवल होतं ! ते हि चारी मुंडया चितपट ! .....

मी हरलो होतो.....
बाप्या जिंकला होता ...
कोमातील कोपरा स्थितप्रज्ञ होता....


---- यशवन्त नवले.
०७-२००७

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २००९

ईर्जिक

ईर्जिक
तर मी काय सांगत होतो की, जग बदलते आहे. मनुष्य प्राणी प्रगतीपथावर आहे. बैलजोडीची जागा ट्रोली ने घेतली. नांगराची जागा ट्रँक्टरने घेतली. बैलाचा कासरा धरणारे हाथ मोबाईल हाताळू लागले. तालमितल्या लाल मातीत घुमनरी पोरं पन्नास हजाराच्या बाईकला लाथ (किक) मारून सुसाट सुटली. आमच्या काळात हे काहीच नव्हतं. अन्न ही मानवाची प्रमुख गरज भगविण्या साठी कोस-कोस दूर चालत जावून बैलाच्या बरोबरीने काळ्या मातीत घाम गाळावा लागत होता. त्या साठी एकमेकाच्या सहकार्याची गरज होती. ईर्जिकीची कल्पना या गरजेतूनच साकारली असावी.

"ईर्जिक" चा साधा आणि सोपा अर्थ "जेवणावळी". मात्र एक गोष्ट ध्यानात घ्या कि ईर्जिक चा खरा अर्थ शब्दा मधे कुणालाही व्यक्त करता येणार नाही. तो अनुभवावा लागतो. जसा मातीचा गंध. जो दरवळ्तो पण शब्दांकित करता येत नाही.
ईर्जिक ही एक व्यापक चळवळ आहे. सहकार्याची, सदभावनेची, आदर्श समाज व्यवस्थेतील माणसा-माणसातील अतूट नात्याची, माणुसकीची आणि प्रेमाची. ईर्जिकी मधे या सर्वा पलिकडले अजून बरेचकाही दडले आहे. ते जाणून घेण्या साठी एका ईर्जिकीचा किस्साच सांगतो. कदाचित त्यातून थोडाफार अर्थ उलगडेल.

एक आटपाट नगर नव्हत.... साध सुध गाव होत.
आटपाट नगरातील राजवाडा नव्हता, राजा नव्हता अन त्याच्या दोन राण्या पण नव्हत्या.ना आवडती ... ना नावड्ती !
तिथे हो्त एक चन्द्रमौळी टुमदार कौलारू घर. शेताच्या बांधाला लागून.
लोक त्याला "धर्माची वस्त्ती " म्हणत !
त्या घराचा राजा होता धर्मवीर. लोक त्याला "धर्मा" म्हणत.
त्याची एकच आवडती राणी होती. नाव तिच द्रोपदी. लोक तिला "धुर्पा" म्हणत.

या राजा-राणीच्या घराच्या तुटक्या-फुटक्या कौलातून चन्द्रोदय झालेवर चंद्राचे चांदणे घरभर विखुरतात. म्हणून हे चन्द्रमौळी घर. तुम्ही याला फाटके-तुटके म्हणू शकता. मी मात्र चन्द्रमौळीच म्हणाणार! वचने किं दारिद्र? शिवाय खर्‍या चन्द्रमौळी घरा मध्ये राहणारॆ तथा-कथित सुखवस्तु लोक, धर्मा-धुर्पा पेक्षा जास्ती सुखी नव्हते. आई अंबाबाईच्या आशिर्वादनं धर्माच्या घरात दोन पोरं बागडत होती.थोरली "रक्मा" अन धाकला "शिवा". गोठ्यात धर्मानं लहानपणा पासून वाढिवलेली खिलारी जोडी अन धुर्पाच्या माहेरा कडून आलेली आंदन-गाय झुलत व्हती.

आता तुम्ही म्हनाल कि ही "आंदन-गाय" काय़ भानगड हाये ?
तर बगा, आम्च्या टायमाला नां , सासुरवाशिण बाई सासरला जाउदे न्हायतर म्हायाराला जाउदे , ती कदीपन मोकळ्या हातान जात नव्हती. तिच्या बरोबर बुत्तीची दुर्डी आन जोंधळ्याच पोतं न्हायतर कडधान्याचं गठुड असनारच. सासुरवाशिण घरला पोचल्यावर दुर्डी खाली होई पवस्तर बुत्ती गांवभर वाटली जायाची. सासुरवाशिण म्हायाराला आल्याची बातमी गावभर पसरायची अन पोरीच्या मैतरनी भरा-भरा गोळा व्हयाच्या.

आता तुम्ही म्हनाल कि ही "बुत्ती" काय़ भानगड हाये ?

बुत्ती म्हंजी साबुती, एक लहान आकाराची सारण भरलेली गोड पोळी. ही बुत्ती गावभर वाटून, सर्वांचे तोंड गोड करून, सर्वांना सासुरवाशिण घरी आल्याच्या आनंदात सहभागी करून घेणारा पदार्थ.
धुर्पा लगीन झाल्यावर पहिल्यांदा म्हायाराला आली. मैतरनीच्या घोळक्यात चारदिस कसं गेल कळलंपन न्हाय.सासरी जायाचा दिस उजाडला अन सर्व्यांच्या डोळ्यात दाटून आल. धुर्पाचा भाउ मुराळी म्हुन जायच ठरलं. त्यान बैलगाडी जोडली. बां न जोंधळ्याच पोतं गाडीत चढीवल.बुत्तीची दुर्डी पांढर्‍या धोतराच्या तुकड्यात बांधून गाडीत ठेवली गेली. धुर्पाच्या आईने तिची खणानारळान ओटी भरून जड अंत:करणान गाडीत बसवलं. बैलाच्या पठीवर थाप पडनार तेवढ्यात धुर्पाच्या बां न आवाज दिला " ए पोरा, जरा थांब !". धुर्पाचा बां बिगीनं गोठ्यात गेला. धुर्पाची लाड्की गाय "तुळसा" चा कासरा सोडला अन गाडी माग बांधून दिला. आंदन म्हनुन . तस बगितल तर धुर्पाच्या आई-बापान लग्नातल्या रुकवतात आंदन म्हनुन मोप भांडी-कुंडी दिली व्हती. पर धुर्पाचा बां लय दूरदर्शी. त्यो रुकवतात आंदन म्हनुन गाय पन देची म्हनत व्हता. भांडी-कुंडी काय निर्जीव वस्तु. पर धुर्पाची लाड्की तुळसा पोरीबर धाड्ली तर तिला सासरी एकटं-एकटं वाटायच नांय. वाट्ल कि माझ्या म्हायाराची जिती-जागती सखी हायं सोबतीला. उद्या आई अंबाबायच्या कुर्पेन घरात चार नातवंड खेळत्यालं. त्यासनी प्वाटभर दुध-दुबत मिळलं. म्हनुन काय रुकवतात गायं? ईक्रितच झाल ! . धुर्पाच्या आईला काय हे पटाना ! ती भर मांडवात धुर्पाच्या बां वर डाफरली ...

" काय यड का खुळं म्हनावं ? रुकवतात कुनी गायं बसिवत्यात व्हयं? पुन्यांदा म्हायाराला ईल तवा द्या काय ती."

त्यो दिस आज उजाडला. धुर्पा बरुबर आज तुळसा पन नांदाया निघाली व्हती. "आंदन " म्हनून!. धुर्पा आन तुळसा सांच्याला सासरी पोचली तवा तुळसाला बगुन धर्मानी सासर्‍याच्या मनातली कालवाकालव बरुबर हेरली.त्यानी दावनीच्या ईतर जनावरा सारखी तुळसाला पर माया लावली. वैरण तोडल्यावर पैली पेंडी तुळसच्या गव्हानित पडायची. रोज वड्यावर न्हिउन खरारा करायचा, बेलफळ लाउन घासुन आंघोळ घालायचा.
शब्दाविना एकमेकाच्या मनातील भावना जाणून त्याला स्वत:च्या आचरणानी प्रतिसाद देण ही फार थोर कला आहे, तिला परिपक्वतेची खोली आहे, दोन व्यक्ती मध्ये द्रुढ नांत निर्माण करण्याची क्षमता आहे मात्र शब्दांचा उथळ्पणा बिलकुल नाही.
धुर्पाच्या बां चा "आंदन-गाय" पाठविण्या मागचा हेतू पूर्णपणे सफल झाला होता. तिच्या दुधावर दोन नातवंड पोसली होती.
तर ही अशी हाय बगा "आंदन-गाय" ची भानगड!.


बोंबलां ! घडाभर तेल नमनालाच खर्ची झाल की ! आपुन कुठ व्हतो आन कुठल्या कुठ भरकटलो तुळसाच शेपुट धरुन!

तर मी काय सांगत होतो की, त्या चन्द्रमौळी घरातल्या राजा-राणीचा संसार लेकरा-बाळा सकिट आन गोठ्यातल्या गाय-म्हशी सकिट मजेत चालला व्हता. बाप-जाद्याची ईस बिगा जमीन हुती. धुर्पा तिचा उल्लेख "काळीमाय" म्हनून करायची. वैशाखाचा वनवा थंड झाला व्हता. जेष्टी पुनव पन उलटून गेली व्हती. म्हातार्‍याच्या आजारपनानं धर्माला पुरा घेरला व्हता. अजुन बिगाभर जमीन पर नांगरून झाली नव्हती. हां हां म्हंता आकाडातल पैल नक्षत्र फुटंल. धर्माला काय कराव काय सुचना झालं. आजच्याला जरी नांगर धरला तरीबी एका नांगरावर हापत्याभरात ईस बिग जमीन कशी काय नांगरून व्हनार? धर्मा शेताच्या बांधावर डोक्याला हाथ लाउन बसला व्हता. पांदीवरन गुरवाच्या म्हाद्य़ाला जाताना बगुन धर्माच्या डोक्यातला तिडा सुट्ला. त्याला एक दिसात आख्खी ईसबिगा जमीन नांगरायची चावी सापडली. धर्मान बसल्या जागवरनं साद घाताली......

" ए ~~ म्हादा ! हाकड ये जरा ! "
म्हादा येउन बांधावर धर्माच्या शेजारी टेकत बोलताझाला...
" कांय धर्मा ! काळजीत दिसतुयास जनुं ! आं ! काय झालं ?"
" त्यच काय हाय म्हादा, म्हातार्‍याच्या दुखण्यापायी आवंदा जमीनीची नांगरट आज पतुर झाली नाय बग ! आता पावसाच्या आगुदर सगळी मशागत उरकायची तर मला ईर्जिकी
शिवाय दुसरा कुटलाच रस्ता दिसत नांय !"
" आरं मग घाल कि ईर्जिक मर्दा ! च्या मायला, एका दिसात आख्ख शिवार उखडुन टाकुया ! दिउ का समध्यासनी उध्याच आवातनं ! बोल !"
घटकाभर डोकं खाजऊन धर्मानं निर्णय घेतला.....
"व्हयं ! त्याच्या बिगर दुसरा कायबि ईलाज नाय ! दे उद्याचं आवातनं सर्व्यासनी !"
"ठरल तर मग ! आत्ताच जाउन सांगतो सर्व्यासनी ! तुमी लागा तयारीला "
म्हादा उठून रस्ता धरणार तेवढ्यात धुर्पानं दरवाज्यातनं हाळी दिली...
" ओ~~ भावजी ! कुट निगालासा लगी ? मी च्या टाकलाय ! बसा जरा यळ !"
धर्माला चहा टाकण्याची आर्डर देण्याची गरज भासली नव्हती. "अतिथी देओ भव " हे धुर्पाच्या रक्तातच होतं. चहा पीत-पीत तिघांनी ईर्जीकीच्या तायरीची बईजवार चर्चा केली.१५-२० आवातनी म्हंजी लहान-मोठी धरून घरटी ४ मानस धर्ली तरी पाउन्शे लोकाची यवस्ता करावी लागंल. शिवाय दोन ईसा जनावराचा दाना-पानी बगावा लागंल. लेकरास्नी दुध लागंल. मीठ-मिर्ची, तेल-तिखाट, दळण ईत्यादी सर्व्या गोष्टी वर चर्चा झाली. ईर्जीकीच्या तयारीची मिटींग दोन मिनिटात संपली आन जो तो आपापल्या कामाला लागला.वस्तीवरून आत्ताच गावात जाव लागनार व्हतं. च्या चा शेवटचा घोट घेउन धर्मा-म्हादा उठलं. धर्मान कनगीतन धा पायली जोंधळ काढुन म्हादाच्या मदतीनं तेची दोन बाचकी बनिवली. दोघांनी एक-एक बाचकं खांद्यावर मारून गावचा रस्ता धरला. किश्या पाटलाच्या चक्कीवर बाचकी उतरून, चक्कीवरच्या पोराला आर्डर सोडली,

"नीट बारीक दळुन वस्तीवर पोचिव रं ! ईर्जीक हायं उद्याला. ".
पोरान मान डोलावली.
म्हादा मधल्या आळीत शिरला अन रस्त्यावरनच सगळ्यास्नी आवातनी ध्यायला सुरवात केली..
"ओ~ शिर्पा.... आरं ईर्जिक हायं उद्या धर्माकड ! लवकर यं सकाळी वस्ती वर! काय ?"
धर्मानं जोश्याच्या पाकाडीतनं वर जाउन मांग वाडयाचा रस्ता धरला. धर्माची चाहूल लागताच वाड्यावरची कुत्री कोकलायला लागली. बिर्‍या मांगाच्या पालासमोर आल्यावर धर्मान आवाज दिला...

"हाईत का बिरुबा घरांत ? "
डोक्यावरच पागुटं सारख करत बिरुबा पालाच्या भाईर आला.
" कोन त्ये ? धर्मादादा व्हयं ! या या बसाकि ! लंय दिसानी येन केलं ! "
बिरुबाच्या बायकुनं पालातली घोंगडी आणुन पालाफुड टाकली.
" नग ! बसाया टाईम न्हाय ! उध्याची ईर्जीक ठिवलिया ! हाल्गी तापउन ठेव बगं ! ईसरू नको "
" न्हाय बां ! ईसरीन कसा ! यतोकि हाल्गी घिउन सकाळी-सकाळी ! बिनघोर र्‍हावा तुमी " .

ईर्जिकीनं "टेकॉफ" घेतला होता. म्हादा आवातनी करून घरी गेला होता. चक्कीवरच्या पोरानं दोन पायल्या जोंधळ्याच पीठ पाडलं होतं. १५-२० घरातल्या बायका पोरांना ईर्जिकीची खबर पोहोचली होती. धुर्पा घरातल्या आवरा-आवरीत गुंतली होती. धर्मा मात्र घरी जाउन बिनघोर झोपला होता. आपल शेत आता पिकणार याची खात्री पटल्याने तो निर्धास्त झाला होता.
शेवटी तो ईर्जिकीचा दिस उगवला. पैल कोंबडं आरावलं तवाच धुर्पा उठली व्हती. आंगुळ-पांगुळ ऊरकून अंगणात सडा घातला. चुल पेटवली अन च्या चं आदंन ठेवल. धर्मानं कुस बदलली तसा धुर्पानं आवाज दिला...

"आवं ~~ उटा कि आता ! का दिस उगवायचि वाट बगताया "

धर्मा उठला. चूळ भरून दोघंनी च्या घेतला.पोरस्नि उठिवलं. वैरण तोडून गुराम्होर गव्हानीत टाकली.
झुंजू-मुंजू झाल तसं एक-एक गडी बैलगाडीत नांगर, जूं , कासरा ईत्यादी आवजार घेउन जमाय लागला. वरच्या आळीचा बाप्या, खाल्या आळीचा धोडुदादा, माळावरला पोपट्या, पाटलाचा रम्या, सुताराचा किसन्या, सोनाराचा ईसन्या, माळ वाडितला भैरू, लव्हाराचा बाळ्या, गुरवाचा दत्या, हौसाक्काचा राम्या, शेलाराचा बाब्या......समदी जंनं आली. दिवस उजडे पातुर पंधरा-ईस गडी जय्यत तयारीनिशी गोळाझाली. धुर्पाची समद्यासनी च्या-पनी देता-देता धांदल उडाली व्हती. तरी बरं ! किसन्याची बायकु हिरा अन पोपट्याची शेवंता सकाळच्या पारी मदतीला आल्या व्हत्या.

च्या झाला.
तंबाकुची चंची समध्यांच्या हातातनं फिरून परत जागच्याजागी आली.
तळहातावरच्या पत्तीला चुना रगडून मस्त मळणी झाली.
तंबाकुचा बार भरून मान तिरकी करून पिचकारी मारीत सर्वीजन उठ्ली.
धोतराचे सोगे खोचले गेले. बैलांच्या मानंवर जूं कसली गेली. नांगरची पाती बांधून, दोन नांगरच्या मधी कासराभर अंतर ठेउन सर्वांनी आपापली पात धरली. कुनालाबी कायबी सांगा-सवरायची गरज पडली नाय. खरं पायल तर धर्मा या शिवाराचा मालक. पर आज त्यो कुनाच्या हिशोबातच नव्हता. जस काय समध्यास्नी अस वाटत व्हतं की हे शिवार आपल हाय, आन ते सांच्यापतुर नांगरून व्हयालाच पायजे.
समदि तयारी झाली.
दत्या गुरवानं बैलांच्या कपाळावर गुलाल टाकून नांगराच्या फाळावर नारळ वाढीवला.
धर्मा-धुर्पा नं काळ्या माईला हळद-कुकू वाहून जमीनीवर डोस्कं टेकिवल तसं बिर्‍या मांगाची थाप हाल्गीवर पड्ली.

हाल्गी कडाडली.
बैलं कान टवकारून फुस्कारायला लागली.
सर्वांनी एकच कल्लोळ केला.....
" भैरुबाच्या नांवानं ~~ चांग भलं ! "

नांगराचा फाळ हाथभर जमिनीत घुसला अन काळीभोर ढेकळं बका - बका उदसून टाकाया लागला.
ईकडं बाया मानसं आपापल्या घरची धुनी-भांडी, केर-पोतारा उरकून लेकरा-बाळांना घिउन धुर्पाच्या वस्तीवर जमाया लागली. जिला जे दिसल ते काम कराया लागल्या. न सांगता न सवारता. समध्याजनी जनुकाय सवताच्याच घरात वावरत होत्या. हौसाक्काची एन्ट्री झाली अन वातावरण बदलून गेलं. हौसाक्का ही सर्व्याजनी मधे जेष्ट. तिचं जेष्टत्व सर्वमान्य. तिनं वस्तीवर पाय ठेवला अन सर्व सुत्र स्वताच्या हातात घेतली.

"ए धुर्पा, दुध तापवायला ठेवलस का ?"

" ए तुळसा, यका चुलीवर काय व्हनार हाय ! आजुन दोन चुली पेटवा ! आत्ता दुपार्च्या जेवायचा टाईम व्हईल ! बापै मानसास्नी भाकरी साठी ताटकळत ठिउ नांय कदी ".

" तुमी दोगी-तिगी कांय करताय गं हिरिवर ? एकीन पानी शेंदा आन दोगीजनी रांजनात आनुन वता."

" ए शेवंता , त्या पोराला पाजं आगुदर! कवापस्न रडतया"

" काय फुलाबाय, बसल्या का तुमी मिसरी लावत ? तुमचं मुरली-वादन उरका बिगिन आन चटनी घ्या वाटायला "

" ए पोरी , ते दुरडीतलं कांदं टाक चुलीत भाजायला"

हौसाक्काच्या भात्यातनं सटासट आर्डरी सुटाया लागल्या आन सगळ्या जणी त्या खुशीनं पेलायला लागल्या. तिची सासुगिरी सर्वजणींना हवी - हवीशी वाटायची. गावच्या कुठ्ल्याही बाईवर कसलंही संकट येउदे, हौसाक्का त्या संकटा समोर ढाली सारखी उभी राहायची. मग दोघीमधे एकतर नवीन नातं निर्माण व्हायच किंवा असलेल नातं अधिकच द्रुढ व्हायच.
आई मधल्या सासूचं आणी सासूमधल्या आईच नातं!. भारतीय आदर्श कुटुंब व्यवस्थेचा पाया भक्कम करणार नातं!.

" बकुळा दिसत न्हाय कुट ती ? परंत वांत्या व्हया लागल्या का काय म्हनावं ?"

हौसाक्काच्या या फेकीन चांगलीच खसखस पिकली.
खर पाहिल तर या सगळ्या जणी आपापल्या घरी जी नैमत्तीक कामं करतात तीच सगळी काम ईथं येउन करीत होत्या. पण ईथ एकत्रित काम करण्याचा आनंद वेगळा होता. हुरुप होता. नवीन घडामोडींची आणी घरोघरीच्या बातम्यांची देवाण - घेवाण चालू होती. एकमेकीच्या कानात कुजबुज चालु होती. चेष्टा-मस्करीला उत आला होता. दर दोन मिनिटाला खसखस पिकत होती. सर्वजणी बाजारात पैसे देउन सुद्धा विकत न मिळ्णार्‍या गोष्टींचा पुरेपूर उपभोग घेत भराभर कामं उरकत होत्या. पोरांची फौज धमाल करीत होती. भांडा-भांडी, रडा-रडी आणी शक्य होतील त्या सर्व उचापती चालू होत्या. जाता-येता कुणीतरी त्यांच्यावर डाफरून, मुलांचे कडून कसल्याही प्रतिक्रियेची अपेक्षा न धरता आपापल्या कामाला निघून जात होते. त्यामुळं सगळी फौज कानात वारं शिरलेल्या वासरा सारखी बेभान होउन आजच्या दिवसाचा पुरेपूर उपभोग घेत होती.
तीन दगडं मांडून तयार केलेल्या चार चुली धगधगायला लागल्या. फोडणीचा झटका नाकात शिरून ठसका-ठसकी झाली. दोन-तीन काटवटीत भाकरीचं पीठ मळायला सुरवात झाली. सर्व काही कंट्रोल मधे आहे याची खात्री करून घेत हौसाक्का पडवीत टेकली, तेवढ्यात धर्मा अंगणात आला..

" हौसाक्का, मी गांवात जाउन येतो जरा. सांच्या ईर्जीकिची यवस्था करुन येतो."

" आगदि बिनघोर जा ! हिकडच संम्ध बगते मी "

नाही तरी आता धर्मा-धुर्पा चा कुठ्लाच रोल शिवारात किंवा घरात राहिला नव्हता. सर्वांनी आपापली जबाबदारी पेलली होती.

धर्मा वस्तीवरनं निघाला तो थेट मन्या सावकाराच्या वाडयावर जाउन धडकला. मोठ्या रुबाबात सावकाराच्या पडवीत चोपाळ्या शेजारच्या खांबाला टेकून बसला. झोपाळा थांबला. दोघांनी एकही शब्द न उच्यारता एकमेकांना न्याहाळल अन सावकार गपचुप उठून माजघरात निघून गेला. धर्माच्या ईर्जीकीची बातमी सावकराच्या कानावर कालच आली होती. त्यामुळ धर्माच्या येण्याच प्रयोजन काय आहे हे कुणी सांगण्याची गरज नव्हती. शंभराच्या पांच नोटा हातात घेउन सावकार परत पडवीत प्रगट झाला. त्यातल्या चार नोटा धर्माच्या हातावर ठेवल्या. जागेवरुन तसुभरही न हालता धर्मानं सावकाराच्या डोळ्यात नजर भिडवली. शब्दाविना नेत्रांची भाषा झाली अन सावकारानं पाचवी नोट धर्माच्या हातात कोंबत वडिलकीच्या हक्कानं दम भरला...

" यवडयात समद भागवायचं ! उगाच पैका हातात आला म्हुन उडवीत बसायच नांय ! निट लक्षात ठेव !"

सावकाराचे शब्द कानात शिरे पर्यंत धर्माने वड्याचा उंबरा ओलांडला होता. रुबाब असा काय कि जणू तोच सावकाराला कर्ज देऊन गेला आहे.

असा हा कर्ज देण्याचा आणि कर्ज घेण्याचा " सो काँल्ड " व्यवहार दोनच मिनिटात व कमित कमी शब्दात पूर्ण झाला होता. कागद नाही, शाई नाही, लिखावट नाही, स्टँम्प पेपर नाही, सही नाही, अंगठा नाही कि साक्षीदार सुध्दा नाही. असा हा आगळा वेगळा व्यवहार फक्त या काळ्या आईच्या कुशीत वाढलेल्या निष्पाप जिवां मध्येच होऊ शकतो. माणिकचंद उर्फ मन्या सावकार हा या गांवचा पिढीजात सावकार. वाड-वडिलांची सावकारी मन्या ने पुढे रेटली होती. पण अशी ही सावकारी म्हणजे आक्रीतच म्हणायच. सावकारकीच्या व्यवसायाला बट्टा म्हणा हव तर !. मन्या सावकार म्हणजे या गावची सार्वजनिक बँक आणी शेती मालाची बाजारपेठ सुध्दां. गावात कुणाच्याही घरी, कसलही अडचण अथवा कार्य असूदे. अगदि बाळंत पणा पासून ते मयती पर्यंत, फायनान्सर म्हणून मन्या सावकार ठामपणे पाठीशी उभा असायचा. पिकांच्या कापणी नंतर खळ्यातली रास घरात यायची. कणगी सारऊन, काठोकाठ भरून शेणाने बंद केल्या जायच्या. अशा प्रकारे पुर्ण वर्षाची बेगमी झालेवर शिल्लक राहिलेल सर्व धान्य पोत्यात भरून गाडी सावकाराच्या वाड्यावर पोहोचायची. सावकाराच्या पडवीत धान्याच्या पोत्यांची थप्पी लागत राहायची. एकदिवस सावकारच्या दारात ट्रक उभा राहायचा. जमाझालेला सर्व शेतीमाल ट्रक मधे भरून सावकार "म्हमई" ला जायचा. चार दिसांनी उगवायचा ते नोटाच पुडकं घेउन. मग एकेकाला वाड्यावर बोलाउन घेऊन आख्या वर्षाचा सविस्तर हिशेब सांगायचा अयशस्वी प्रयत्न करायचा...

" हे बग भैरू, तुझी जवारी भरली धा किंट्ल, त्याचे एवढे पैसे झाले...

बाजरीचे एवढे, हळदीला काय या वर्षी चांगला भाव भेटला नाय, त्याचे एवढे ...
सर्व मिळून एवढे झाले..एवढे

ट्रक वाल्याला एवढे दिले, त्यात तुझा हिस्सा एवढा....

पोरीच्या लगनाला तू एवढे घेतले होतेस...

दिवाळ सणाला तुझ्या बायकुनं एवढे नेले...

बँकेच्या भावा परमान माझ्या याज एवढ झालं ....
आणी हे आता एवढे शिल्लक रहिले ... हे घे "
सावकराचा हिशेब कसा चोख असायचा. त्यासाठी कसाल्याही कागद पत्राची गरज नसायची. सावकार हिशेब सांगत रहायचा अन समोरचा माणूस सावकाराची बडबड या कानाने घेऊन त्या कानाने सोडत राहायचा. सावकाराचे शेवटचे दोन शब्द " हे घे " कानात शिरले कि पट्कन हाथ पुढे व्हायचे. सावकाराने हातात ठेवलेल्या नोटा कोपरीच्या खिशात कोंबत तो माणूस चालता व्हायचा अन दुसरा टपकायचा. हे रूटीन आठवडाभर चालू राहायच.

तर असा हा मणिकचंद सावकार फक्त " गांवची बँक आणी शेत मालाची बाजार पेठ " या पुरताच मर्यादित नव्हता, तर अजून एक जबाबदारी त्याने स्वत:च अंगावर ओढून घेतली होती. वडिलकीच्या नात्याने गांवकर्‍यांच्या भविष्याची चिंता करण्याची जबाबदारी. कसं ते या किस्या वरूनच कळेल ...

त्याच काय झालं, मागल्या वर्सी चैतीची पुनव झाल्यावर कुदळवाडीचं पावनं भैरूच्या थोरल्या लेकीला बगायला आलं. पोरगी देखणी. चार-चौघीत उठून दिसायची. नाकी-डोळी सरस. चांगल्या संस्कारात वाढलेली. नांवं ठेवाया काय पर जागा नव्हती. कुदळवाडीकरांनी लगुलग पसंती सांगुन टाकली. कुदळवाडीकराच घरान बी मात्तबर. दोन्ही बाजूनी होकार भरला. झालं . लग्नाची बैठक बसली. दोन्ही गांवची वयस्कर मानसं पानाला चुना लावत अन सुपारी कातरत समोरासमोर बसून एकमेकाला तोलत होती. भैरू अगुदरच फाटक्या खिशाचा. त्यात समोरची पार्टी मात्तबर. कुदळवाडीत तेंचा मोठ्ठा बारदानां. ही सोयरिक आपल्याला काय झेपणार नाय म्हनून भैरून आगुदरच कच खाल्ली व्हती. पर पोरगी खात्या-पित्या घरात पडनार म्हनून गांवकर्‍यांनी अन भैरूच्या बाकुनं त्याला भरीस घातलं. बैठकीत एकेक ईषय यायला लागला तस भैरूच्या छातीत धडधडाया लागलं. भैरू तोंड उघडाया लागला कि किस्ना मास्तर त्याला डोळ्यांनी दटाउन " गप गुमान र्‍हा " म्हनून सांगत होता. एकेक मुद्दा फुड सरकत होता.......

लग्नाचा मांडव पोरीच्या दारात पडनार ............... ....................ठरलं !
उमदा घोडा, ताशा-पिपानीचा ताफा ..........................................ठरलं !
नवरा-नवरीची कापडं, शालु , हळदीच लुगड्म ........ ..............ठरलं !
आई कडल डोरलं, आजी कडून नथ, सासू कडून गंठण ...........ठरलं !
मामाच कन्यादान, आत्याच पैजण.........................................ठरलं !
वरमायांचा मान, आजचीर , रुकवतावरची साडी .....................ठरलं !
वरबापाचा पोशाख, मामाला फेटा .........................................ठरलं !
मावळणीची घागर, तिचा मानपान ......................................ठरलं !
करवलीचा मान , कानपिळ्याचा पोशाख .............................ठरलं !
बारा बलुतं दारांचा मान .................................................ठरलं !
हे...............................ठरलं ! ते...................................ठरलं !

सर्वांचा मानपान, परंपरागत रीती-रिवाज सांभाळत आणी चार कलाक घोळ घालत चाललेली ती बैठक एकदाची भैरवीच्या सुरावर येउन ठेपली. शेवटी किस्ना मास्तरानी मधुमध भला मोठा दगड ठेउन तेच्यावर सुपारी ठिवली. हुबं र्‍हाउन खडया आवाजांत सगळ्या ठरावांची पुन्यांदा उजळणी केली अन समस्त उपस्थितांना शेवटचा सवाल केला......

" तर काय मंडळी , फोडायची का सुपारी ?"

लोकं कबुली देण्यासाठी तोंड उघडणार तेवढयात कशीकाय ती माशी शिंकली आन उजव्या कोपर्‍यातल्या बायामानसांच्या कंपूतनं पैल्यांदाच खणखणीत आवाज उठला..............

" आमच्या घरच्या लक्षीमीला कायं लंकेची पारवती म्हून पाठिवतसा का काय म्हनावं ! आमच्या खानदानात धां सुना नांत्यात या घडीला ! पर कंच्याच कार्यात आस नाय घडल कधी ! निदान पाच-सा तोळ्याचा यकादा डाग नकोव्हय घालाया ? जनाची नाय निदान मनाची तरी.... ?"

झालं ! वरमायनं अगदि शेवटच्या क्षणी ठिणगी टाकून पोरीच्या आई-बापाच्या वर्मावर घाव घातला होता. बायामानसांच्या कंपूत त्या ठिणगीचा वणवा पेटायला वेळ लागला नाही. नवर्‍या कडल्या बायांच्या अंगात झाशीची राणी तर नवरी कडल्या बायांच्या अंगात कडकलक्ष्मी संचारली होती. उणी-दुणी काढून झाली, घालून-पाडून बोलणी झाली आता फकस्त एकमेकीच्या झिंज्या उपटायच्या बाकी होत. चांगला कलाकभर तमाशा झालेवर शेवटी हौसाक्काच्या मध्यस्तीन रणांगण शांत झाल अन वरमाय "तीन तोळ्यावर " तयार झाली. पण भैरू काय व्हय भरायला तयार व्हयना आन सुपारी काय फुटनां. शेवटाला कुदळवाडीचं पाटिल फेटा सावरत बोलायला उभं र्‍हायल तसी सगळी जण एकदम चिडीचुप झाली.....

"हे बगा मंडळी, यवडा खंल घालुन पर तोडगा निघत नाय मजी ह्या सोयरीकीचा काय योग दिसत नाय ! तवा आमी म्हनतो कि आता उठावं. तिनिसांजच्या आत आमास्नीबी वाडीवर पोचाया पायजे. तवा आता आमास्नी निरोप ध्या. "

वरपक्षाची ही निर्वाणीची भाषा ऐकून ईतका येळ एका कोपर्‍यात गप-गुमान बसलेला मन्या सावकार खाड्कन ऊभा राहून खड्या आवाजात फुट्ला ........

" पाटी~~ल ! ही बैठक सुपारी फुटल्या बिगर उठनार नाय!. गांवच्या ईभ्रतीचा सवाल हाय ! चला, घातल तीन तोळ पोरीच्या अंगावर ! हा गावच्या सावकाराचा सबूत हायं. आता फोडा सुपारी. तुमास्नी सोयरिकीची पुरणपोळी खाउ घातल्या बिगर हे गाव सोडू देनार नायं . "

कुदळवाडीच्या पाटलांनी परिस्थितीचं गांभिर्य लगोलग ओळखून सावकारा फुड हात जोडले....
" हे बगा सावकार, उगीच गैरसमज करून घेउ नकासा ! आमास्नी कुनाच्या ईभ्रतीला हात घालायचा नाय का कुणावर राग पन न्हाय ! पोरीच्या बापाला हां भरायला लावा, ही आत्ता सुपारी फुटंल!"

मन्या सावकार तावातावान उठला अन भैरूला बकुटीला धरून मागच्या दाराला घेउन गेला. मागुमाग किस्ना मास्तर पण गेला.
"भैरू ! माज ऐक लेकां . पोरीच ठरत आलेल लगीन मोडू नगं ! खात्या-पित्या घरी पोरगी सुखात राहील बग ! आता माग हटू नगं "
" पर सावकार, हे समध नाय झेपायच माझ्याचानी ! जमिनीचा तुकडा ईकावा लागंल न्हायतर डोक्यावर कर्जाचा डोंगर उचलावा लागंल ! मग बायकापोरांच्या पोटांत काय काट
घालू ? दोन-चार वर्षात धाकली पर ईल लग्नाला ! कस काय जमनार सार?"
भैरू डोळ्यात पाणी आणून पोटतिडकीन बोलत होता.
" तसं कायपंर व्हनार नाय ! मी काय सांगतो ते नीट ऎकून घे ! तुझ्या हातात पैका टिकत नाय हे मी पैल्या पासन वळकुन व्हतो. तुझ्या हातात नोटा पडल्या कि पार्‍या वाणी निस्टुन जात्यात. म्हनुन तुझ्य़ा धाकल्या पोरीच्या जलमा पासून आज पर्यंत तुझ्या उत्पन्नातला तिसरा हिस्सा मी परस्पर किस्ना मास्तराकडम जमा केलाय. मास्तरानी तालुक्याच्या पोस्टातनं तुझ्या नावावर सर्टिफिकिटं घेउन ठेवल्यात. तवा आता पैशाची कायपर फिकिर नाय. ईचार वाटलस तर मास्तरला ! "
भैरू भांबावल्या सारखा किस्ना मास्तराकडं बगाया लागला.....
"खरं हाय सावकार म्हंत्यात ते ! आजच्या घडीला तुझा पैका चांगला दान-दुप्पट झालाय. आर मर्दा, तीन तोळ काय घेउन बसलास, कुदळवाडीकरांनी पाच तोळ मागितल तरी तू देऊ शकतोस१. चल ! ताट माननं हो भर आन दे बार उडउन !"
दोघांच्या बोलण्यान भैरूचा ऊर भरून आला. पागुटयाच्या टोकानं डोळं टिपुन भैरू पडवीत दाखल झाला ते धा हत्तीच बळ घेउनच. सगळीकड चिडिचुप झालं. भैरू काय निर्णय घेनार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मिशीवरन हात फिरवीत भैरूनं ताट मानेन सगळीकड नजर फिरवली. शेवटी विहिणबाई बसलेल्या कंपूवर नजर स्थीर करून गर्जना केली ...............

"घातल तीन तोळ पोरीच्या अंगावर ! आनि वर जावयाला अंगठी पन घालतो ! फोडा सुपरी"
किस्ना मस्तरानी क्षणाचाही विलंब न करता, बैठकीला अजून पाय फुटण्या आगुदर हातातल्या दगडाचा सुपारीवर घाव घातलुन पार भुगा करून टाकला. गुरवाचा दत्या शिंगाला तोंड लाउन तयारच होता. शिंगाची थुई-थुई गावच्या वेशी पर्यंत जाउन घुमली अन समद गांव समजून चुकलं ! भैरूच्या पोरीची सुपारी फुटली ! सोयरिक जुळली!
एका मिनिटात सार वातावरण बदलून गेल. पानसुपारीची ताटं फिरायला लागली. हळदी-कुकवाचं करंड मिरवाया लागल.. काही वेळेपुर्वीच्या रणांगणाचा मागमूस सुध्दा राहिला नव्हता. वरमाय तोंडाला फेस येविस्तोवर व्हनार्‍या सुनेचं कवतुक कराया लागली. भैरूची बायकु जावायाच आप्रुक गायाला लागली. सयपाक घरात पुरणा-वरणाच्या सैपाकाची तयारी सुरु झाली. पडवीत पाचव्यांदा च्या चा कप जिरवीत तंबाकुच्या चंच्या उघडून शेतीवाडीच्या गप्पा रंगात आल्या. हळू हळू एकएक गावकरी कुदळवाडीकरांना रामराम करून काढता पाय घ्यायला लागला. शेवटी मन्या सावकार निरोप घेउन निघाला तस भैरूनं सावकाराला मिठी मारली .........

" सावकार ! आज तुमी देवासारकं धाऊन आलासा म्हुन मी वाचलो बगा ! न्हायतर गावात छी-तू झाली आसती !"
" आसं नगं म्हनूस मर्दा ! तुझी पोरं आन माझी पोरं काय यगळी हायती व्हय ! आनी म्या तरी आशी काय मर्दानकी गाजावलिया ? तुझा खिसा फाटका म्हनून तुझ्याच घामाचा पैका, तुझ्याच खिशातनं काढून मास्तराच्या भक्कम खिशात ठिवला."

तर मंडळी, असा हा आमचा मन्या सावकार. कागाद पत्रावर विश्वास नसलेला. फक्त माणसातील माणुसकी तारण म्हणून स्वीकारणारा. गांवचा अभिमानी. लोकांच्या भविष्याची चिंता करणारा. वसुली साठी कुणाच्याही दारात न फिरकणारा मात्र अडीअडचणीला हमकास टपकणारा. सावकारकीचा कुठलाही गुणधर्म नसलेला तरी सुध्दा यशस्वीपणे सावकारी करणारा. थोडक्यात काय तर सावकारकीच्या व्यवसायाला काळीमा फासलेला असा हा मन्या सावकार. त्याच्या या सरळ पणाचा गैरफायदा घेण्याचे धाडस कुणी केल नव्हतं.
तरी सुध्दा गांव तिथ हगीणदारी ही आलीच. बेन्या लव्हार हा त्याच घाणीतला किडा . बायकुच्या आजारपणाला म्हनून सावकारा कडनं सा महिन्याच्या बोलीवर कर्ज घेउन गेला आन दारू पीत बसला. बिचारी बायकु मरून गेली तरी याचा रोजचा खांबा चालूचं. धा महिनं उलटून गेल तरीबी सावकाराच्या वाड्यावर फिरकला नायं. बरं वसुलि तरी कशी करावी? उभ पीक शिरगांवच्या मारवाड्याला ईकून मोकळा झाला. वाट बगून बगून शेवटी सावकारानं तेच्या दारावर जाउन तगादा लावला. सुरवातीला टोलवा टोलवी करणारा बन्या शेवटी शेवटी सावकारावर डाफराया लागला. कायद्याची भाषा कराया लागला. काय पुरावा हाये तुझ्याकड मी पैस घेतल्याचा, आस उलटून ईचारायला लागला. सावकारान वळकुन घेतलं कि आपल पैस डुबलं. हळहळला बिचारा. रातभर झोपला नाय. सकाळी उठला तो डोक्यात सनक घेउनच. तडक कुंभार वाड्यावर जाउन एक मडकं घेतलं. तिरक्या न्हाव्याला त्याच्या धोपटी सकट फरपटत बन्याच्या घरासमोर घेउन गेला. दारात बसकन मारीत तिरक्याला हुकुम सोडला .......
"कर माज मुंडन ! मिशा सकट भादरून टाक मला "
सावकाराचं लालबुंद डोळं बगुन तिरक्याचं काय पन ईचारायचं धाडस झाल नांय. त्यानी गुमान भादरायला सुरवात केली. बातमी वणव्या सारखी गांवभर पसरली. अर्धा गाव जमा झाला अन बन्याच्या घरा भोवती कोंडाळं करून हुबा र्‍हायला. पर कुनाची हिंमत झाली नाय सावकाराशी बोलायची .पयल्यांदाच आस आक्रीत घडत होतं. बन्या मात्र दारात बसून दात ईचकत फिदीफिदी हासत सावकाराकड बगत व्हता. भादरून झाल्यावर सावकारान मडक्यात पाणी भरून खांद्यावर घेतल. बन्याच्या घराला उलट्या तीन फेर्‍या मारून मडकं सोडून दिलं. मडकं फुटल्याचा आवाज झाला अन सावकारान बन्याच्या नावान जोरजोरात बोंब ठोकली. कुणाशीही एकही शब्द न बोलता परत फिरला. जाता जाता बन्याला बजाऊन गेला ....
" बन्या ~~ भडवीच्या माझ पैसं डुबवलंस....... दारूत घातलंस ...... स्वताच्या बायकुला खाल्लंस .........तुझ्या नावानं मडक फोडल मी आज ! कुतर्‍याच्या मौतीनं मरशील बग !"
सावकार तडक घरी गेला. वड्याचा दरवाजा बंद करून आडसर टाकला तो दुसर्‍या दिवसा पर्यंत उघडला नाही.
सावकारानं दिलेला शाप खरा ठरला. सावकार शांत झाला. त्याने स्वत: पुरता "बन्या" अध्याय कायामचा बंद केला. पण गावानं बंद केला नाही. दुसर्‍याच दिवसा पासून गावच्या पोराठोरा पासून ते म्हातार्‍या कोतार्‍या पर्यंत सर्वांनी उत्फूर्त पणे, सामुहिक रित्या, बन्या विरुध्द "असहकाराचे" अघोषित युध्द पुकारले. गांधी बाबांनी सर्व सामान्यांना दिलेले यशस्वी हत्यार........ "अहिंसा आणी असहकार".
बन्याचा दानापानी बंद झाला. त्याला कुणी दारात उभं करेना. विहिरीवर कुणी पाणी भरू देईना. वाणी सामान देईना. चांभार चप्पल शिऊन देईना. शिंपी कपडे शिउन देईना. शेतीच्या कामाला मजूर मिळेना. बन्या अगदी एकटा पडला. जिथ जाईल तिथ हाडतुस व्हायला लागली. सावकाराच्या वाड्यावर जाउन नाकदुर्‍या काढल्या, गावकर्‍याचा हातापाया पडला. पण काहीसुध्दा उपयोग झाला नाही. सर्वजण आपाल्या भूमिकेवर ठाम होते. ज्या वटवृक्षाच्या छायेत सारा गाव नांदतो आहे त्या वटवृक्षाला लागलेले बांडगूळ कायमचं छाटून टाकणे आवश्यक होते. शेवटी बन्या वैतागला अन एक दिवस गांव सोडून ??????? ला पाय लाऊन पळून गेला. गांधी बाबाच हत्यारंच तस होत. आहो, एवढया मोठ्या ईंग्रजाला पळता भुई थोडी झाली तर मग हा बन्या किस झाड की पत्ती !

बोंबलां ! धर्माची ईर्जीक र्‍हायली बाजुला अन आपंन कुटल्या कुट भरकटत गेलो ? भैरूच्या पोरीची सुपारी फोडून बन्याच तेराव पन घालून आलो ! ह्या सगळ्या घोळात धर्माची ईर्जीक पडली कि बाजूला !

तर धर्मा ईर्जीकी साठी सावकाराकडून पाच नोटा घेउन भाईर पडला खरा, पर सावकाराच्या मनाला यका गोष्टीची चुट्पुट लागून र्‍हायली. आता ईर्जीक म्हनल्यावर रातच्याला वस्तीवर बकरं पडनार. सगळ मैतर मिळून मटनाचा रस्सा कोपरापोतर धार जाईस्तोर वरपनार. मग तेच्या जोडीला म्हनून धर्मान फुगा घेउन जाउनाय मजी मिळवली.

आता तुमी म्हनाल फुगा मजी काय?. त्याच आस हाय कि फुगा, खंबा, चपटी ही समदी एका द्रवरूप पदार्थाची माप आहेत. गावच्या जत्रला ह्या मापांचा लंय सुळसुळाट आसतो. एरवी कधीतरी कुनाकड खंडुबाचा जागर आसंल न्हायतर गावात तमाशाचा फड उतरला तरच ही मापं कानावर पडत्यात. म्हंजी आस कि, एकटा-दुकटा आसल तर चपटीत भागतं, जोडीला एक-दोन मैतर आसलं तर खांबा लागतो अन टोळक आसल तर फुग्या शिवाय भागत नाय.

पर धर्मानं हौसाक्काच्या भितीनं फुगा-बिगा काय घेतला नाय. सावकाराच्या वाड्यावरन निगाला तो सरळ धनगर वाड्यावर गेला.केरबा धनगर जाळीत मेंढरं कोंडून लोकर भादरत होता. धर्माला आलेला बगुन केरबान लहान-मोठी चार बकरी कळपातन बाजूला केली. धर्मानं बकर्‍यांच्या मागल्या खुब्यात हात घालून उचलून वजनाचा अंदाज घेतला. त्यातलं एक बकरू निवडून केरबाला ईचारलं.........

" ह्याच काय घेनार बोल "
केरबान उजव्या हाताची पाच अन डाव्या हाताची दोन बोट दाखवीत व्यवहाराच्या घासा-घासीचा श्रीगणेशा केला.
" काय बोलतो मर्दा, ह्याच सातशे ? तुझी बकरी काय सोनं हागायला लागली का काय म्हनावं. नीट ह्यवारानी बोल कि जरा "
तासभर घासाघीस करून धर्मान चार नोटा केरबाच्या हातात ठेवल्या आणि निवडलेल बकर पाट्कुळी मारून रस्ता धरला. हौसाक्कान सांगीतलेल्या चार गोष्टी वाण्याच्या दुकानातून घेतल्या. मशिदीला वळसा घालून टेकाडावरनं उतरत आब्बास भाईला आवाज दिला ....
" ओ ~~ आब्बास भाई, हायसाकां घरात ?""
दारावरचा जुन्या ओढणीचा पडदा बाजूला करीत आब्बास भाईने बाहेर डोकावल ...
" कौन ? धर्मा क्या ?हमको रातकोच मालुमपड्या ईर्जिक है करके ! दुपेरको आताय काटनेको ! "
" थोडा लवकरंच आव ! शिजनेको टाईम लगता है " ... धर्मान जवळ होत तेवढ हिंदी फांडत वस्तीचा रस्ता धरला.
धर्मा वस्तीवर पोहोचे पर्यंत दिस डोक्यावर आला होता. निम्म शिवार नांगरून झाल होतं. लोकांनी दुपारच्या जेवणाची सुट्टी केली होती. बैल झाडाखाली वैरण चघळीत, अंगावर धन्याची थाप पडायची वाट बघत होती. गडी मानसं भाकरी खाऊन बांधावर सावलीला तंबाखू मळीत बसली होती. धर्मान खांद्या वरच बकर खाली उतरऊन झाडाला बांधल. हातातल सामान हौसाक्काला देउन वसरीला टेकला. पोरांनी बकर्‍या भोवती कोंडाळ करून नावीन उचापती सुरू केल्या. धुर्पानं पायरीवर आनून ठेवलेला पण्याचा तांब्या नरड्यात रिता करीन धर्मा उठला. हिरीवर जाउन पानी शेंदल अन सर्व्या बैलास्नी बादली-बादली पानी दावलं. एकएक गडी उठून आपापल्या शेजंनं कामाला लागला. तेवढ्यात शेलाराच्या सुगंधानं धर्माला वसरीच्या उंबर्‍यावरन आवाज दिला .........
" ओ~~ भावजी ! जिउन घ्या कि आगुदर ! धुर्पाक्का ताटकाळ्यात कवाधरनं ! सकाळपासन पोटात काय बि नाय बगा !"
" आत्तां ! च्यामारी, मी काय तिला उपाशी र्‍हायला सांगितल हुत व्हयं ! जेवायचं व्हत सगळ्या संगट ! "
" तस नव्ह भावजी ! तुमी जेवल्या बिगर घास उतरल व्हय धुर्पाक्काच्या गळ्या खाली ! आता भरवा पैला घास तुमीच !"
सुगंधाच्या बोलण्याने सगळ्याजणी तोंडाला पदर लाउन फिदि-फिदि हसायला लागल्या. धुर्पा बिचरी पार लाजून चुर्र झाली. तिन पडवीत घोंगडी टाकली. ताट वाढलं. पाण्याचा तांब्या ठिवला अन आजून काय चेष्टा-मस्करी व्हायच्या आत घरात निघून गेली. धर्मा गुमान जेवायला बसला. हात धुवस्तोवर आब्बास भाई आपली हत्यार पाजळत हजर झाला. त्यानं पोरांच्या कोंडाळ्यातन बकर्‍याची सुट्का केली अन लांब खिवराच्या झाडाखाली घेउन गेला. पोत्यातन सुरी काढली. बकर्‍याला आडव पाडून जबरदस्तीन तोंडात पाणी ओतून खटका उडवला. झाडाच्या फांदीला उलटं लटकऊन भराभर कातडी सोलून काढली. पोटात सुरी खुपसून साफ-सफाई झाली. बाभळीचा ओंडका उभा करून त्यावर खटाखट सत्तूर चा आवाज व्हायला लागला. धर्मानं आणून ठेवलेल्या भल्या मोठ्या भगुल्यात मटनाचं तुकडं पडायला लागलं. आब्बासभाईन तासाभरात आपल काम चोख बाजावलं. मुंडी आणी कातडी पोत्यात कोंबून आब्बासभाई चालता झाला.
होय ! मुंडी-कातडी हीच आब्बासभाईची मजुरी. गांवची पध्द्तच होती तशी. बरेचसे व्यवहार हे चलना शिवाय व्हायचे.
दिवस मावळतीला झुकला होता. चार चुली परत पेटल्या होत्या. तव्यावर भाकरी पडत होत्या. भल्या मोठया तप्याल्यात मटान रटरटत होतं. फोडणीचा खमंग वास नाकात घुसून पोरांच्या पोटात कावळं कोकलायला लागल होत. बाया मानसांची लगबग वाढली होती. तिकड नांगरटीनं शिवाराच शेवटचं टोक गाठलं होतं. बैलं घायकुतीला आली होती. आता थोड्याच टायमात सुट्टी व्हनार हे त्या मुक्या जनावरांनी वळीकल होत. जसा जसा नांगरटीचा शेवट जवळ येत होता तसा बिर्‍या चेव आल्या सारखा हालगी बडवीत बैलांना प्रोत्साहित करीत होता. शेवटी हाथभर दिवस असतानाच हालगी थांबली. आख्खं शिवार दिवस मावळायच्या आत उदसून टाकलं होत. सर्वांच्या चेहेर्‍यावर आनंद पसरला होता.

प्रोजेक्ट "ईर्जीक " यशस्वी झाला होता.
नो प्रोजेक्ट मँनेजर , नो प्रोजेक्ट टीम .....
नो कन्सलटन्सी , नो फिजिबिलिटी स्टडी ...
नो लीगल अडव्हायसर , नो ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट ...
नो वर्कर्स , नो वेजेस ...........
नो मिटींग्ज , नो बिझनेस लंच ....
नो गाडी , नो घोडा .........
नो इन्फ़्रास्ट्रकचर , नो नेटवर्क ....
नो फायनान्सीअल रिसोर्स , नो करन्सी एक्स्चेंज ....
नो शेड्युलिंग , नो डी.आर. पी. ......
ओन्ली काँमन टारगेट अँड विल टू अचीव्ह ईट .... व्हाट वंडर ..........
" प्रोजेक्ट वाँज अ ग्रेट सक्सेस "

बैलांच्या माना जुआतून सुट्ल्या. सगळे बापें आवरा आवर करून हिरीवर हातपाय धुया गेल. धर्मान पेंडीच्या पोत्याचं तोंड खोलून घमेलं-घमेलं पेंड सरव्या बैलाफुड सरकवली. तेवढ्यात धुर्पा भाकरीची चवड हातावर घेऊन आली. स्वताच्या हातानी एक-एक भाकरी बैलास्नी भरवीत प्रेमानी त्यांच्या अंगावरन हात फिरिवला. ईर्जिकीच्या पैल्या पंगतीचा मान बैलास्नी मिळाला होता. ती बैलं कुणाच्या मालकीची आहेत हा प्रश्न गौण होता. मुक्या जनावरांना सुध्दा माणसा बरोबरीन वागणूक मिळाली होती. त्या साठी धर्मा-धुर्पाला "ह्युमन रिसोर्स, डेव्हलप्मेंट अँड मोटिव्हेशन " सारख्या "ट्रेनिंग प्रोग्राम " ला जायची गरज भासली नव्हती. जी माणसं मुक्या जनावरांच्या "काँन्ट्रीब्युशन" च एवढ्या उत्त्म प्रकारे "अँप्रिसिएशन" करू शकतात, त्यांना "ह्युमन मोटिव्हेशन" च कांय ट्रेनिंग देणार ?

बापय मानस बांधावर बसून सकाळ पासनं वावरात घडलेल्या लहान-सहान घटनांची उजळणी करीत, एक-मेकांची टिंगल-टवाळी करण्यात रमली होती. आज आपण एक "प्रोजेक्ट " यशस्वी पणे पूर्ण करून धर्माला चिंता मुक्त केलं आहे, याची कुणालाही जाणीव नव्हती. त्यांच्या साठी हा फक्त गाव-गाड्याच्या अन गावकीच्या रिती-रिवाजांचा एक भाग होता. दिवस मावळला होता. कडुसं पडल होत. धर्मानं वाण्याकडून उसनवारीवर आणलेली गँसबत्ती पेटउन वसरीवर आड्याला टांगली. धुर्पानं घोंगड्याच्या घड्या पसरून पंगतीची तयारी केली. पितळ्या, वटकावनं , तांबे मांडले गेले. बाया मानसांची लगबग शिगेला पोहोचली होती. चुली धगधगत होत्या. भाकरीच्या चवडी उंचावत होत्या. मटणाचा रस्सा रटरटत होता. हौसाक्काची नजर चौफेर भिरभिरत होती. सगळी तयारी झाली तसा धर्मान बांधाचा दिशेनं आवाज दिला .........
" चलाउठारं ~ माझ्या मर्दानू ~~, बसा पंगतीला "
पंगत बसली. गरमगरम मटनाचं कोरड्यास अन घरच्या जोंधळ्याची पांढरी-फेक भाकरी. पुन्यांदा एकदा " भैरुबाच्या नांवानं ~~ चांग भलं ! " करून सर्वेजण तुटून पडले. तस बगितल तर, मटाण-भाकरीच जेवान सगळीजन कधी-मधी जेवत्यातच की !. पर आजच्या जेवनाची चव काय यगळीच व्हती. हौसाक्काची मँनेजमेंट तशी कधीच फेल जात नाय. पार कोपरा पर्यंत वगळ येईस्तवर रस्सा भुरकत होते. सोबत तोंडी लावायला चवदार गप्पा अन एक-मेकांची चेष्टा-मस्करी. खाणारांच्या तोडीला-तोड वाढणार्‍या होत्या. पैल्याभाकरीचा शेवटचा घास तोंडात घालेपर्यंत दुसरी भाकरी ताटात पडत होती. लगुलग गरम-गरम रस्याची वाटकं पितळीत पालत होत होतं. हौसाक्का सगळ्या पंगतीवर नजर ठिऊन होती. पंगत चांगलीच रंगली होती. तीन-तिगाड जाती एक-मेकाच्या मांडीला मांडी लाऊन जेवत होती. आपल्या मांडीला चिकटलेली मांडी कुठल्या धर्माची आहे, कुठल्या जातीची आहे याचं कुणालाच सोईर-सुतक नव्हतं. आणि ही प्रवॄत्ती "डेव्हलप " करण्या साठी कुणी "सर्व धर्म समभाव " या विषयावराचं रटाळ व्याख्यान पन "अटेंड" केल नव्हतं. या पंगतीच अजून एक वैशिष्ठ म्हणजे, सोनाराचा ईसन्या अन गुरवाचा दत्या हे दोघे " जानवं धारी " शुध्द शाकाहारी सुध्दा ह्याच पंगतीला बसून, त्यांच्या साठी आवरजून केलेल्या वेगळ्या गोडाच्या जेवणाचा आस्वाद घेत होते. शेजारचा दाताखाली हड्डी फोडतोय म्हणून त्यांचा धर्म भ्रष्ट झाला नव्हता. धुर्पा पंगतीत फिरून आग्रह करीत होती ....

" ओ ~म्हादाभावजी ! यवड्यात झालव्हय ! घ्या कि एक भाकरी ! एकदम गरम हाये बगा !" ------ धुर्पा.
" नका आग्रिव करू वैनी ! प्वाट भरल आता " -------म्हादा.
" आरं घे कि मर्दा ! तुझ्या कारभारणीनच केलिया ती भाकरी ! " -----------सुताराच्या किसन्यान फिरकी घेतली.
" आत्तागं बया ! किसन्या, मुडद्या, तुलारं कसं रं ठाव ? भाकरीवर काय करनारनिचं नांव कोरलय व्हय ?" ----- हौसाक्का.
" आता एकदम गरम हाये म्हंजी त्याच्या बायकुनंच केली असनार कि ! " --------- किसन्या.

किसन्याच्या फिरकीनं चांगलाच हाशा पिकला. पंगतीत पन अन सयपाक घरात पन. यवडा हाशा पिकायला पन तसंच कारण व्हतं. म्हादाच्या बायकुनं "गरम डोक्याची " म्हनून आख्या गावात नाव कमावल होत. किसन्याचा "डायलाँग" ऐकून पुरती शरमून गेली बिचारी. तसा नाकावर राग पन आला, पर यवडया सार्‍या बापयं मानसा समोर तोंड उघडायच धाडस केल न्हाय पोरीनं. शिवाय वर हौसाक्काचा धांक. गप र्‍हायली बिचारी. या अचानक झालेल्या हल्यान कावरा बावरा झालेला म्हादा, मदतीच्या अपेक्षेनी हौसाक्काकडे बघू लागला. त्या संधीचा फायदा उठवीत धुर्पानं म्हादाच्या ताटात भाकरी वाढून मटनाची वाटी पालथी केली. म्हादा गुमान खाली मान घालून नवी भाकरी कुस्करायला लागला. मस्करीला वेगळं वळण लागणार नाही याची काळजी घेत हौसाक्कान फर्मान सोडलं ....
"बास झाली मस्करी ! गुमान जिऊन घ्या पोटभर ! पोरी ताटकळल्यात कवाच्या "
जेवणं उरकली. पंगत उठली. सिताफळीच्या झाडाखली हात धुउन, ढेकरांच्या लांबलचक डरकाळ्या फोडत मंडळी अंगणात टाकलेल्या सुतडयावर विसावली. मधे पानाचा डबा अन तंबाकूची चंची. पानाला चुना फासला गेला. सुपारीचं कात्रण अन तंबाकुची मळणी सुरु झाली. सुचेल त्या विषयांवर लांबलचक गप्पा सुरु झाल्या. शेतीवडी झाली. पावसाचे अंदाज वर्तवले गेले. राज कारण झाल. गांवकारण झाल. धर्माच्या अंगणातलं, चंद्राच्या चांदण्यातल खुल व्यासपीठ चांगलच रंगल होतं.
तोपर्यंत ईकडे बायकांनी जेवणं उरकून आवरा-आवर केली. सगळी झाका-पाक झाल्यावर एक-एक बाई धुर्पाचा निरोप घ्यायला लागली. पोराला कडेला मारून, पडवीच्या पायर्‍या उतरत आपल्या धन्याला हाक देत होती.....
" आवं ..! उटा कि आता ! किती रात झालिया बगा कि ! "
हळू हळू सगळ घर खाली झालं. शेवटी हौसाक्काला तिच्या घरापर्यंत पोहोचऊन धर्मा वस्तीवर परत आला. घराच्या पायरीवर एकटाच बसून चांदण्याच्या प्रकाशात नांगरट झालेल्या आपल्या शिवराकड एकटक पाहात राहिला. काल पर्यंत अशक्य वाटणरी गोष्ट आज सहजा सहजी शक्य झाली होती. वीस बिगा जामीन एका दिवसात नांगरून झाली होती. आता पाऊस गरजनार होता. उदसून वर आलेली ढेकळ न्हाऊन निघणार होती. काळ्याशार मऊ मतीत बीजं रुजणार होतं. नाजूक कोंब फुटणार होते. हिरवगार पीक वार्‍यावर डोलणार होतं. काल पर्यंत धर्माच्या डोक्यावर असलेल ओझं उतरलं होतं.
धर्माला बराच वेळ अस बसलेल पाहून धुर्पा त्याच्या जवळ आली. मायेन त्याच्या खांद्यावर हात ठेवीत म्हनाली ....
"आव~~धनी ! कितीयळ बसनार आस काळ्या आईकडं बगत ? मिटली आपली काळजी एकदाची. चला, झोपा आता निवांत ! "
धर्मा उठला. धुर्पान अंथरलेल्या घोंगड्यावर आडवा होऊन, आपल्या चद्रमौळी घरातलं चांदण पांघरून निवांत झोपला.
ईर्जीक संपली होती. नेहमी प्रमाणे यशस्वी झाली होती. पण अध्याप "ईर्जीक " चा खरा अर्थ उमगला नव्हता.
एवढच माहीत होत, कि काल राती पासून आत्ता पर्य़ंत जे जे घडल त्याला ईर्जीक म्हणतात.

आता तुम्हीच सांगा मंडळी, ईर्जीक चा खरा अर्थ!
ईर्जीक चा अर्थ केवळ "जेवणा वळी " पुरता मर्यादित आहे ?
ईर्जीक चा अर्थ शब्दात व्यक्त करता येईल ?
ईर्जीकीत सामील झालेल्या पात्रांची मनं, भावना, संस्कार, संस्क्रुती.... ईत्यादी, ईत्यादी शब्दांकित करता येईल?
अशी ही ईर्जिक काळाच्या ओघात लोप पावते आहे. कारण माणूस प्रगती पथावर आहे. तरी सुध्दा आत्ताच खरी ईर्जिकीची गरज आहे.
धर्माने घातलेली ईर्जिक त्याच्या वीस बिगा जमीन आणी १५-२० सहकार्‍या पुरती मर्यादित होती.
माझा देश काश्मिर पासून ते कन्या कुमरी पर्यंत कित्येक बिगा पसरलेली आहे.
राजकीय ईर्जिक घालून फोफावलेला भ्रष्टाचार आणि सफेद गुंडाराज उखडून काढण्या साठी करोडो सहकार्‍यांची गरज आहे.
सामाजिक ईर्जिक घालून बाबू लोकांचे लाच घेऊन बरबटलेले हात उखडण्या साठी ईर्जिक जिवंत राहाण गरजेच आहे.
सांस्क्रुतिक ईर्जिक घालून भारतीय संस्क्रुतीच्या वटवॄक्षाला लागलेल बांडगूळ छाटण गरजेच आहे.
सन्मान-जागृतीची ईर्जिक घालून मध्यम वर्गीय नामाक मुक्या प्राण्याला "मोटिव्हेट "करण्याची गरज आहे.
धर्मातील "धर्म" अन हौसाक्कतील "हौस " जागृत रहाण गरजेच आहे.
खरच माणूस प्रगती पथावर आहे ?
---- यशवन्त नवले.
२६-११-२००९
.